पावसाचा पुन्हा दणका

Heavy rainfall in Maharashtra
Heavy rainfall in Maharashtra

पुणे - मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे. कोेकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम होता. खरीप पिकांना या पावसाने दणका दिल्याने शेतकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली. नुकसान कमी करण्याचे प्रयत्नही अपुरे पडत होते. राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद पुणे जिल्ह्यातील माळेगाव (ता. बारामती) येथे १४५ मिलिमीटर झाली. पणदरे येथे ११७, वडगाव निंबाळकर येथे १३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बारामतीमध्ये पावसाचा जोर प्रचंड असल्याने शेतामध्ये पाणीच पाणी झाले. चारापिके पाण्याखाली गेली. ओढे-नाले दुथडी भरून वाहिले.

नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतीकामांचे नियोजन बिघडले असून, शेतीमालाचे नुकसान झाले. कांदा, मका, सोयाबीन व द्राक्षबागांना फटका बसला. बाजरी, सोयाबीन व मका पिकाचा काढणी हंगाम सुरू असून, पावसामुळे सोंगणीची कामे थांबली. उन्हाळी कांदा लागवडीसाठी टाकलेली रोपे खराब होत आहेत. कांदा लागवड व कापूस फुटून वेचणीसुद्धा खोळंबली आहे. निफाड तालुक्यात द्राक्षबागेत डाऊनी, मण्यांना तडे व मणीगळ होऊन नुकसान होत आहे. पिकांवर करप्याचा प्रादुर्भाव पावसामुळे वाढला आहे. टोमॅटो, मका, कांदा या पिकांचेही नुकसान झाले आहे.

सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाने सर्वदूर हजेरी लावली. आटपाडी तालुक्यातील सुमारे बारा पूल पाण्याखाली गेले आहेत. खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी थांबली आहे. सोयाबीन भिजले, द्राक्षशेतीत पाणी साचल्याने डाऊनीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. दुष्काळी भागातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला.  

कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसाने खरीप पिकांच्या कापणीला मोठा दणका बसला असून, सर्व शेतीकामे ठप्प झाली आहेत. कापणीला आलेल्या भाताबरोबर सोयाबीन व भुईमुगाची काढणीही थांबली आहे. शेतशिवारांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. शाहूवाडी तालुक्‍यात चार दिवसांपासून पावसाने खरीप हंगामी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पावसाने तालुक्‍यात धुमाकूळ घातला असून, भात पीक कोलमडून गेले आहे. शेतीकामाचे संपूर्ण वेळापत्रक पावसाने कोलमडले आहे. 

सातारा जिल्ह्यात सलग दोन दिवस पावसाने झोडपून काढल्यानंतर सोमवारी पावसाने विश्रांती दिली. पाटण तालुक्यात भातपिकाचे मोठे नुकसान झाले. शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होत आहे. सोयाबीन, भुईमूग, भातकाढणी पूर्णपणे ठप्प झाली आहे. सोयाबीन भिजल्याने डाग; तसेच बुरशी आल्याने सोयाबीन कमी दराने विक्री करावी लागणार आहे.

पाऊस दृष्टिक्षेपात...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी
नाशिक जिल्ह्यात शेतीकामांचे नियोजन बिघडले
आटपाडी तालुक्यातील सुमारे बारा पूल पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप कापणीला दणका
पाटण तालुक्यात भातपिकांचे मोठे नुकसान 
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पाऊस 
अकोला जिल्ह्यात वेचणीचा कापूस ओला झाला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com