
Accidents News : देशात सर्वाधिक अपघाती मृत्यू महाराष्ट्रात, हे जिल्हे बनले आहेत अपघातांचे हॉटस्पॉट
सोलापूर - देशात सर्वाधिक अपघाती मृत्यू महाराष्ट्रात होतात. महाराष्ट्रात सर्वाधिक अपघाती मृत्यू पुणे, नाशिक, नगर व सोलापूर जिल्ह्यात होतात अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांनी दिली.
देशात सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात होतात. राज्यात दरवर्षी जवळपास १५ हजार व्यक्ती रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात. यामध्ये पुणे, नगर, नाशिक, सोलापूर हे जिल्हे टॉपमध्ये आहेत.
या जिल्ह्यामध्ये अपघाती मृत्यूपैकी ६५ ते ७० टक्के मृत्यूच्या घटना घडतात. त्यात सोलापूर जिल्ह्याचा समावेश असल्याने आम्ही जिल्ह्यात अपघाताची संख्या कमी होण्याच्या दृष्टीने काम सुरु केले. (Maharashtra News)
सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी अपघाताच्या संख्येत ८ ते १५ टक्के वाढ होत असे. मागील दोन महिन्यात आम्ही तालुका स्तरावर यंत्रणा कामाला लावली. प्रत्येक अपघाताचे विश्लेषण करुन त्यावर काही निष्कर्ष काढले.
तसेच त्यानुसार काही मुद्यांवर रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने, काम सुरु केले. त्यानंतर जानेवारी व फेब्रुवारी अखेरीस पुन्हा अपघाताच्या घटनांचे विश्लेषण केले. तेव्हा अपघातांची संख्या वाढण्याऐवजी ३ टक्क्यांनी घटली आहे.अपघातांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी संख्या कमी व्हायला झाल्याचे दिसून आले.
मागच्या वर्षी याच कालावधीत रस्ते अपघातात ११३ जणांचा मृत्यू तर या वर्षी १०८ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेषत: जे उसाचे ट्रॅक्टर वाहतुकीमुळे जे अपघात होत होते, त्यात लक्षणीय घट झाली आहे.जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त,आरटीओ अधिकारी, बांधकाम विभाग यंत्रणाच्या या कामी समन्वय दिसून आला.
सोलापूर जिल्ह्यात ५० ते ५५ टक्के दुचाकीचे अपघात आहेत. २४ टक्के अपघात हे पादचाऱ्यांचे आहेत. ग्रामीण भागातील अपघातांचे प्रमाण ७४ टक्के आहे. जिल्ह्यात संध्याकाळी ६ ते रात्री १२ च्या सुमारास अपघाताचे प्रमाण मोठे आहे. त्यासाठी आम्ही यावरतची उपाययोजना केल्या आहेत.
महाराष्ट्राची तुलना जपानशी होते. कारण आपल्याएवढेच अपघात जपानमध्ये आहेत. त्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
वाहनांची वेग मर्यादेबद्दल केंद्राकडून निर्णय होतील. प्रत्येक रस्त्याचे सेफ्टी ऑडिट करण्यचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरु आहे.
यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे, विजय तिराणकर, मोटार वाहन निरीक्षक महेश रायभान, संदीप शिंदे, सुखदेव पाटील, किरण खंदारे, राहुल खंदारे, पल्लवी पांडव, शिरीष पवार, किरण गोंधळे, सिद्धाराम पांढरे, प्रदीप बनसोडे, शीतलकुमार कुंभार उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातील अपघाताचे विश्लेषण
- राज्यातील सर्वाधिक अपघात होणाऱ्या चार जिल्ह्यात समावेश
- प्रत्येक तालुक्यात अपघाताच्या घटनांचे विश्लेषण करुन रस्ते सुरक्षेचे उपाय
- उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघातात कमालीची घट
- मागील दोन महिन्यात अपघाताची संख्या तीन टक्क्यांनी घटली