सागरी प्रवाशांना विम्याचे कवच 

सागरी प्रवाशांना विम्याचे कवच 

मुंबई - रेल्वे, विमान सेवेप्रमाणेच जलप्रवासालाही लवकरच "विम्याची कवच कुंडले' मिळणार आहेत. महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) यासाठी सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांबरोबर चर्चा सुरू केली आहे. लवकरच या प्रस्तावाला मान्यता मिळणार आहे. 

जलवाहतुकीला राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे. या पार्श्‍वभूमीवर जलवाहतूक अधिक सुरक्षित व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार या प्रवाशांना विम्याचे संरक्षण देण्याचे निश्‍चित केले आहे. मुंबईत येणारे बहुसंख्य परदेशी पर्यटक घारापुरी लेणी आणि अलिबाग येथे बोटीने जातात. त्यामुळेही मंडळाने विम्याची कल्पना पुढे आणली आहे. 

"एमएमबी'च्या आकडेवारीनुसार राज्यात दरवर्षी दोन कोटी प्रवासी हे समुद्रमार्गे प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत विम्याची कवच कुंडले असणे महत्त्वाचे आहे. प्रवाशांना किती रकमेचा विमा द्यावा, यावर चर्चा झालेली नाही. 

तिकिटात विम्याची रक्कम समाविष्ट करण्याचा विचार सुरू आहे. विमा प्रीमियमबाबत कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. चर्चा झाल्यावर निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली. 

गृह विभागाकडून दक्षता 
बिहारमध्ये जानेवारीत बोट दुर्घटना घडली होती. त्यात 20 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. भविष्यात अशा घटना राज्यात होऊ नयेत, याची खबरदारी गृह विभागाने घेतली आहे. त्याचबरोबर सागरी प्रवास करणाऱ्यांचाही विमा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रेल्वे आणि विमान प्रवासाप्रमाणे बोटीने प्रवास करणाऱ्यांना विम्याची कवच कुंडले मिळणार आहेत. संरक्षणाचा विचार करता हा प्रस्ताव महाराष्ट्र सागरी मंडळाच्या विचाराधीन आहे. विम्याबाबत खासगी आणि सरकारी कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. 
- अतुल पाटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com