सिंचनाचे अर्थसाह्य महामंडळाच्या खात्यावर 

सिंचनाचे अर्थसाह्य महामंडळाच्या खात्यावर 

मुंबई - प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील प्रकल्पांसाठी मिळणारे केंद्रीय अर्थसाह्य व राज्य हिश्‍शापोटी "नाबार्ड'कडून मिळणारे कर्ज तसेच "बळिराजा जलसंजीवनी योजने'तील नाबार्डचा कर्जनिधी महामंडळाच्या खात्यात थेट जमा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

या निर्णयामुळे प्रशासकीय बाबींसाठी होणारा कालापव्यय दूर होऊन सिंचन प्रकल्पांना गती मिळणार आहे. या संदर्भात केंद्र शासन व नाबार्ड यांना राज्य शासनाकडून विनंती करण्याबाबतचे पत्र पाठविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने'अंतर्गत सध्या केंद्र शासनाकडून मिळणारे केंद्रीय आर्थिक साह्य, तसेच राज्य शासनाच्या हिश्‍शापोटी "नाबार्ड'कडून मिळणारी कर्जाची रक्कम राज्य शासनाच्या एकत्रित निधीत जमा होते. राज्यातील प्रकल्पांसाठी हे आर्थिक साह्य प्राप्त करून घेण्यासाठी जलसंपदा विभागाकडून वित्त विभागास तसा प्रस्ताव सादर करावा लागतो. त्यास मंजुरी मिळून निधी उपलब्ध झाल्यानंतर संबंधित प्रकल्पांना निधी वितरित करण्यात येतो. या प्रक्रियेस बराच कालावधी लागतो. त्यामुळे आज हा निर्णय घेण्यात आला. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 2016-17 ते 2019-20 या कालावधीत राज्यातील 17 मोठे व 9 मध्यम अशा एकूण 26 प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी केंद्र शासनाकडून 3830 कोटींचे अर्थसाह्य मिळणार आहे. 

साताऱ्यातील कुडाळी प्रकल्पास मान्यता 
सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्‍यातील कुडाळी मध्यम प्रकल्पास 2013-14 च्या दरसूचीनुसार 635 कोटी किमतीस दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे जावळी तालुक्‍यातील 42 गावांतील 5 हजार 327 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. कुडाळी मध्यम प्रकल्पांतर्गत कुडाळी नदीवर जावळी तालुक्‍यातील महू आणि हातगेघर येथे धरणे बांधण्यात येत आहेत. या दोन्ही धरणांवर प्रत्येकी दोन अशा एकूण 4 उपसा सिंचन योजना सुरू करण्यात येणार आहेत. 

सिंधुदुर्गमधील अरुणा प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता 
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी तालुक्‍यातील अरुणा मध्यम प्रकल्पास 2016-17 च्या दरसूचीनुसार 1 हजार 689 कोटी किमतीस तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 5 हजार 310 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.अरुणा मध्यम प्रकल्पांतर्गत वैभववाडी तालुक्‍यातील हेत येथे अरुणा नदीवर 93.378 दशलक्ष घनमीटर क्षमतेचे धरण बांधण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com