
जालना - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सरटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जनंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांची आज भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, मागे जेव्हा मराठा मोर्चे निघाले तेव्हाचं म्हणालो होतो, तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. हे सर्व राजकारणी तुमचा वापर करून घेतील, मत पाडून घेतील. हा मुद्दा सुप्रीम कोर्टाचा आहे. ते सतत तुम्हाला आरक्षणाचं अमिष दाखवून झुलवत ठेवणार आहे. कधी हे सत्तेत कधी ते विरोधात. सत्तेत आले की, तुमच्यावर गोळ्या झाडतात, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.
राज ठाकरे आंदोलकांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही पोलिसांना दोष देऊ नका. पोलिसांना लाठीचार्जचे आदेश ज्यांनी दिले, त्यांना दोष द्या. पोलिस काय करणार? ते तुमच्या आमच्यातलेच आहेत. समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या नावाखाली तुमच्याकडे मतं मागितले होते. मी तेव्हाच सांगितलं होतं की, हे शक्य नाही. आपले गडकिल्ले सुधारले पाहिजे.
दरम्यान तुमच्यासमोर आरक्षणाचं आणि पुतळ्याचं राजकारण केलं जातं. मी आज तुमच्यासमोर भाषण कऱण्यासाठी आलो नाही. ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या आणि गोळ्या चालवल्या त्यांच्यासाठी मराठवाडा बंद करून टाका, अस आवाहन राज ठाकरे यांनी आंदोलकांना केलं. ते पुढं म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणतात, याचं राजकारण करू नये, का करू नये, तुम्ही काय केलं असतं, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
या गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी आपला मुल्यवान जीव गमावू नका. त्यांच्यासाठी एकजण गेला तर फरक पडत नाही. आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. या लोकांच्या नादी लागू नका. आता निवडणुका नाहीत. मात्र निवडणुका आल्या की, काठीचा हल्ला लक्षात ठेवा, काठीचे व्रण विसरू नका, अस आवाहनही राज ठाकरे यांनी केलं.