मुंबई - राज्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत चांगली कामे झाली असली, तरी यंदा समाधानकारक पाऊस न पडल्याने ऑक्टोबरमध्येच टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ सरकारवर ओढवली आहे.
मर्यादित सिंचन सुविधा, अवर्षणप्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, अनिश्चित व खंडित पर्जन्यमानामुळे कृषी क्षेत्रातील अनिश्चितता वाढली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर 2014 मध्ये "जलयुक्त शिवार अभियान' राबविण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत गेल्या तीन वर्षांत सुमारे 16 हजारांहून अधिक गावांमध्ये ही कामे सुरू झाली. राज्य शासनाबरोबरच लोकसहभाग व स्वयंसेवी संस्थांचा यामध्ये मोठा सहभाग या योजनेत झाला. अनेक गावांमध्ये लोकांनी स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. या अभियानाबाबत कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात आला होता. जलसंधारणाच्या माध्यमातून पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नालाबांध, जुने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध, के. टी. वेअर दुरुस्ती व नूतनीकरण, जलस्रोतांतील गाळ काढणे, जलस्रोत बळकटीकरण, विहीर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे, नाले जोड कामे हाती घेण्यात आली होती.
जलसंधारणाचे अनेक उपाय विविध शासकीय योजनांसोबतच लोकसहभागातून राबविण्यावर भर दिला जात आहे. लोकांमध्ये जलजागृती करणे, जलअंदाजपत्रक तयार करण्याच्या कामात जनसहभाग यामुळे हे अभियान एक लोक चळवळ बनल्याचे चित्र आहे.
विशेषतः ही कामे कायम दुष्काळ सहन करणाऱ्या मराठवाड्यात अधिकच्या प्रमाणात घेण्यात आली. असे असले तरी यंदा पावसाने ओढ दिल्याने राज्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
- गेल्या तीन वर्षांत निवड झालेल्या गावांमध्ये 4,98,206 इतकी "जलयुक्त'ची कामे पूर्ण
- अभियानात 2018-19 या वर्षासाठी 6,200 गावांची निवड करण्यात आली आहे.
टॅंकरची सद्यःस्थिती
विभाग टॅंकर गेल्या वर्षी याच तारखेला टॅंकरची संख्या
कोकण 00 00
नाशिक 118 24
पुणे 21 32
औरंगाबाद 182 28
अमरावती 8 23
नागपूर 00 00
एकूण 329 107
|