Jayant Patil: "जयंत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याचा प्रस्ताव नाकारल्यानेच ईडी चौकशी" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil

Jayant Patil: "जयंत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याचा प्रस्ताव नाकारल्यानेच ईडी चौकशी"

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी ईडीने तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते चांगलेच संतापले आहेत. राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईत जमा झाले होते. तर फक्त विरोधकांचीच चौकशी होत असल्याचंही अनेक नेत्यांनी म्हंटलं आहे. या चौकशी प्रकरणावरून दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबेल करण्यात आला आहे. जयंत पाटील यांनी भाजपची गुलामगिरी नाकारली. त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळेच त्यांना ईडीचं बोलावणं आल्याचा मोठा गौप्यस्फोट ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

आयएएल अँड एफएस या कंपनीच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने जयंत पाटील यांची चौकशी केली. ते ही माहिती लेखी स्वरुपातही मागवू शकले असते. पण एखाद्याला त्रास द्यायचा म्हटला की सभ्यता गुंडाळून ठेवली जाते. या कथित घोटाळ्यातील लोक भाजपशी संबंधित लोकही असू शकतील. पण त्यांना चौकशीला बोलावलं जात नाही, असा हल्लाबोल दैनिक ‘सामना’तून करण्यात आला आहे.

काय लिहलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावे असा त्यांच्यावर दबाव होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जयंत पाटील यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच ईडीने त्यांना बोलावणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. ईडीने अनेकांच्या बाबतीत हे घडवले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या घरगडय़ांसारख्या वागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांची साडेनऊ तास चौकशी होते, पण भाजपमधील भ्रष्टाचाऱ्यांना मोकळे रान मिळते. मात्र चौकश्यांचा कितीही फेरा मागे लावलात तरी स्वाभिमानींना शांत झोप लागते हे जयंत पाटील यांनी दाखवून दिले. पाटला-पाटलांत फरक असतो! काही पाटलांचे पाणीच वेगळे असते. जयंतराव त्यापैकीच आहेत.

जयंत पाटील यांची नऊ तास चौकशी झाली. ते घरी गेले. त्यांना सुखाने झोप लागली असेल. निर्भय लोकांनाही सुखाची झोप लागते. हर्षवर्धन पाटील आणि संजय काका पाटील हे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनाही सुखाने झोप लागली. काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्याने त्यांच्यावरील ईडीचं बालंट टळलं.

जयंत पाटील यांनी भाजपची गुलामी पत्करायचे नाकारले. त्यामुळे त्यांना लगेच ईडीचं बोलावणं आलं. पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावं असा त्यांच्या वर दबाव होता. तशी राजकीय वर्तुळात चर्चाही होती. पण जयंत पाटील यांनी हा प्रस्ताव नाकारल्याने त्यांना ईडीचे बोलावणे आले. ईडीने अनेकांच्या बाबत असेच केले, असा दावाही या अग्रलेखातून करण्यात आला आहे.