मुंबई - महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ह्या तीन राज्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या गोदावरी नदीवरील तेलंगणा येथील जगातील सर्वात मोठ्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण आज होणार आहे.
दुष्काळाने होरपळून निघालेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लिमिटेड आणि भारत हेवी इलेक्ट्रिक यांनी 18 महिन्यांच्या विक्रमी वेळात उभारलेल्या या प्रकल्पाद्वारे गोदावरीचे 13 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी लिफ्टद्वारे उचलले जाणार आहे. हे पाणी उचलण्यासाठी जमिनीखाली 14.09 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केल्याचे प्रकल्प संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले.
|