
विश्लेषण: कसबा पेठेतील पराभवातून महाराष्ट्र भाजपाने काय शिकावं?
Kasba bypoll result Analysis
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी ११,०४० मतांनी भाजपा उमेदवार हेमंत रासनेंचा पराभव केला आहे.
कसब्यात भाजपाचा पराभव होणार, असं भाकित वर्तवलं जात होतं. अखेर यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झालंय. या पराभवाचं ‘सकाळ’च्या मृणालिनी नानिवडेकर यांनी केलेलं विश्लेषण...
महाविकास आघाडीचा विजय, कारण... How mva won kasba bypolls
जनतेशी थेट संपर्क असलेल्या नेत्याला काँग्रेसने तिकीट दिले. २००९ मध्ये धंगेकर मनसेकडून लढले होते. तेव्हाही धंगेकर यांना जवळपास ४७ हजार मते घेतली होती.
योग्य उमेदवार, योग्य प्रचार हे सूत्र महाविकास आघाडीने यशस्वीपणे राबविले. महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणूक लढवली आणि जिंकली हे कसब्यातील विजयामागचं महत्त्वाचं कारण ठरलं.
चिंचवडने तारले, पण ही तर धोक्याची घंटा
चिंचवडमध्ये भाजपचा विजय होणार हे निश्चित आहे. चिंचवडमध्ये तिरंगी लढत नसती तर भाजप संकटात आली असती. चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होती.
यात राहुल कलाटे यांना तब्बल २१ हजार मते मिळाली आहेत. तर अश्विनी जगताप यांना ६८ हजार आणि नाना काटे यांना ५५ हजार मते मिळाली आहेत. ही आकडेवारी दुपारी दोनवाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार आहे. यावरुन कलाटे यांनी मते फोडल्याने अश्विनी जगताप यांना फायदा झाल्याचे दिसते.
फडणवीसांनी सूत्रे हातात घेतली खरी, पण तोवर...
कार्यकर्त्यांशी अत्यंत जवळचे नाते असणारे, त्यांना आधार देण्यासाठी कायम हजर असणारे चंद्रकांतदादा पाटील २०१९ साली सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात पुण्यातल्या कोथरुडमध्ये आले आणि गिरीश बापट यांच्या नेतृत्वाला काहीसा पर्याय उभा झाला.
सर्वसमावेशक व्यक्तीमत्व असलेले बापट गेल्या काही वर्षांपासून तब्येतीमुळेही काहीसे बॅकफूटवर होते. यंदाची निवडणूक हाताबाहेर गेली असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यात लक्ष घालणे सुरु केले पण तोवर हातून बरेच काही निघून गेलेले होते.
हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात येऊन गेले.
गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशा दिग्गज नेत्यांनी पुण्यात मुक्काम ठोकलेला. तरी देखील भाजपाला हा पराभव टाळता आलेला नाही. त्यामुळे भाजपाच्या संघटनात्मक ताकदीवर या पराभवाने प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.