सोलापूर - राज्यात यंदा गंभीर दुष्काळ असून, पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीपोटी भरपाई मिळावी, या उद्देशाने राज्यातील 94 लाख 64 हजार कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. विमा कंपन्यांकडून आता छाननीचे काम सुरू झाले असून, नववर्षाच्या प्रारंभी शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात वादळ, अतिवृष्टी यासह अन्य कारणांमुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई दिली जाणार आहे. त्यानुसार विमा कंपन्यांनी क्लेम सेटलमेंटची कामे सुरू केली आहेत. दुसऱ्या टप्प्यात सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात भरपाई दिली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. यंदा राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप पीकविम्यापोटी 48 कोटी 60 लाख रुपये भरले आहेत. यावर्षी राज्यातील 85 लाख हेक्टरवरील पिके दुष्काळामुळे बाधित झाली असून, त्याचा सुमारे 82 लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारच्या हिश्श्याची रक्कम विमा कंपन्यांना पुढील आठवड्यात दिली जाईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
यंदाच्या खरीप हंगामात पिकांच्या नुकसानीपोटी विमा भरलेल्या शेतकऱ्यांची विमा कंपन्यांकडून छाननी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार असून, त्यादृष्टीने विमा कंपन्यांना सूचना दिल्या आहेत. महिनाभरात सर्व प्रक्रिया पूर्ण होईल.
- विजय घावटे, संचालक, विस्तार व प्रशिक्षण (कृषी)
खरीप पीकविम्याची स्थिती
कर्जदार शेतकरी - 15.39 लाख
बिगरकर्जदार शेतकरी - 79.25 लाख
विमा संरक्षित रक्कम - 1,895 कोटी
|