
Anil Parab : साई रिसॉर्ट प्रकरणातली याचिका किरीट सोमय्यांनी घेतली मागे; काय आहे कारण?
मुंबईः मागच्या काही वर्षांपासून अनिल परब यांच्याशी संबंधित साई रिसॉर्ट प्रकरण गाजत आहे. या प्रकरणातील एक याचिका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झालीय.
साई रिसॉर्टच्या मुद्द्यावरुन भाजपने अनिल परब यांना घेरलेलं आहे. या प्रकरणात ईडीकडूही चौकशी झालेली आहे. आज किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्ट प्रकरणातली याचिका मागे घेतली आहे. हायकोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याने सोमय्यांनी याचिका मागे घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
समुद्र किनारपट्टी नियमन अधिनियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी हरित लवादामध्ये याचिका दाखल केलेली होती. अनिल परब आणि सदानंद कदम यांच्याविरोधात राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल होती. मात्र आज ती मागे घेण्यात आलेली आहे. हायकोर्ट आणि ईडीकडे सुरु असलेलं प्रकरण चालूच राहणार आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
ईडीच्या आरोपपत्रात जरी अनिल परब यांचं नाव आरोपी म्हणून नसलं तरीदेखील या प्रकरणात अनिल परब यांच्या नावाचा वारंवार उल्लेख करण्यात येत आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणाचा तपास अजुनही सुरू आहे. तर या प्रकरणात जयराम देशपांडे आणि सदानंद कदम हे ईडीच्या अटकेत आहेत. तर दुसरीकडे सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी यांच्या नावाचाही ईडीच्या आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे.