Raj Thackeray : राज ठाकरे भाजपपासून दूर जाताहेत की BMC निवडणुकीआधी दबावतंत्राचा भाग? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

Raj Thackeray : राज ठाकरे भाजपपासून दूर जाताहेत की BMC निवडणुकीआधी दबावतंत्राचा भाग?

BMC निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि भाजपात खटके उडत आहे. २०१९ पासून भाजप समर्थनात बोलणारे राज ठाकरे आता भाजत विरोधात बोलत आहेत. राज ठाकरेंचा  BMC निवडणुकीआधी दबावतंत्राचा हा भाग आहे का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कर्नाटक निवडणुकांचे निकाल लागले आणि राज ठाकरे यांचे सुर पुन्हा बदलला आहे.

कर्नाटक निवडणुकीत काँग्रसने जोरदार मुसंडी मारली. भाजपला कर्नाटकात ६६ जागांवर समाधान मानावे लागले. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी भाजपवर ताशेरे ओढले होते. तसेच ही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे हे यश असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते.

राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्यात वाद रंगला होता. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांनी देखील पलटवार करत जोरदार शाब्दिक प्रहार केला होता. मुंबई महापालिका निवडणुकीत युतीत स्थान मिळवण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे, त्यामुळे दबाव तंत्राच वापर केला जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

त्र्यंबकेश्वर प्रकरणात राज ठाकरेंची प्रतिक्रिया -

नाशिक येथील ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर सध्या चर्चेत आहे. या मंदिरात हिंदू धर्मियांशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही असा नियम आहे. मात्र 13 मे रोजी रात्री काही तरुणांनी मंदिराचे उत्तर दरवाजातून जबरदस्ती आत जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर भाजपने हे प्रकरण उचलून धरले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर या प्रकरणात एसआयटी स्थापन केली. मात्र राज ठाकरे यांनी भाजप विरोधात भूमिका घेतली आहे. त्र्यंबकेश्वर येथील प्रकरणावरुन रान उठवणाऱ्या भाजपला राज ठाकरे यांनी सुनावले आहे.

वर्षानुवर्षे जर  प्रथा असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही, महाराष्ट्रामध्ये अनेक अशी मंदिरे आणि मशिदी आहेत, त्याठिकाणी हिंदू मुस्लिम एकोप्याने राहतात. माहीम मधील उरूसाला माहिम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल चादर चढवतो, जर इतर धर्माचा माणूस मंदिरात आला तर इतका भ्रष्ट होणारा कमकुवत धर्म आहे का? अशा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे राज ठाकरे भाजप पासून दूर जात आहेत का की हा दबावतंत्राचा भाग आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. २०१९ पासून राज ठाकरे भाजपसमर्थनात बोलत आले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारला देखील राज ठाकरे यांनी पाठींबा दिला होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांचे राज ठाकरे यांच्या घरी दौरे वाढले होते. मात्र आता राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे भाजप आणि मनसेत खटकलं का? असा प्रश्न चर्चेत आला आहे.

बारसू रिफायनरीला विरोध -

'बारसू रिफायनरी'ला देखील राज ठाकरे यांनी जाहीर विरोध केला होता. जाहीर व्यासपीठावरून त्यांनी रिफायनरी विरोधात भूमिका मांडली होती. राज ठाकरे यांनी बारसूतील कातळ शिल्पाविषयी माहिती सांगितली होती. "युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली आहेत. त्या संस्थेने आजूबाजूला विकासकामे व्हावेत की नाही हे ठरवलं आहे. बारसूत सापडलेल्या कातळ शिल्पाच्या परिसरात तीन किलोमीटरच्या अंतरात विकासकामे करता येत नाहीत. तरीही सरकार घाट घालत आहे," असे राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरेंनी यासंदर्भातील फोटो आणि मॅप उपस्थितांना दाखवले होते.

मुंबईतील भाजप नेत्यांवर टीका -

कर्नाटकमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला यावर बोलताना राज ठाकरे यांनी अंबरनाथ येथे बोलताना भाजपावर टीका केली होती. कर्नाटकात पराभव झाला आहे तो स्वभावाचा आणि वागणुकीचा झाला आहे , असा आरोप त्यांनी भाजपावर केला होता. यावर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी स्वप्नातल्या प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो, मै भी जिंदा हू हे दाखवण्यासाठी यांची प्रतिक्रिया आहे, असा पलटवार केला होता.

राज ठाकरे यांनी देखील शेलार यांना सुनावले होते.  "ज्यांची पोहच नसते त्यांना या गोष्टी सुचत असतात. ज्यावेळी निवडणुका होतात, त्यावेळी नाक्यावर जाऊन सभा घेणारी लोक आहेत, ज्यांच अस्तित्व मोदींमुळे आहे, त्यांना खाली कोण ओळखत. अशा लोकांना मी फार महत्त्व देत नाही असे ही म्हटले," असे राज ठाकरे म्हणाले होते.