दौलताबाद (जि. औरंगाबाद) : दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या केसापुरी येथील शरद कळसकर याने दोन वर्षांपासून मोबाईल वापरणेच सोडून दिले होते, अशी माहिती समोर आली आहे.
त्याचा मित्र ज्ञानेश्वर सुराशे यांनी सांगितले, "शरदला राजकारणाची आवड नव्हती. गावातील दोन्ही राजकीय गटांबाबत तो तटस्थतेचे धोरण ठेवायचा. तो म्हणायचा की, या दोन्ही राजकीय गटांचे लोक त्याच्या कुटुंबीयास आपल्या गटात ओढण्यासाठी माझ्याशी मोबाईलद्वारे कायम संपर्क करायचे. त्यांना कंटाळून मी दोन वर्षांपासून मोबाईल वापरणेच सोडून दिले. तो कोल्हापूरला जाण्याअगोदर आम्हा मित्रांसोबतच असायचा. आम्ही सर्व जण रात्री हरिपाठ, भजन म्हणायचो. सर्व जण मिळून समाज मंदिरातच जेवण करून तिथेच झोपायचो. त्याला शेतीची आवड होती; पण निसर्गाची साथ नसल्याने तो निराश झाला व चार वर्षांपूर्वी मित्राच्या मदतीने कोल्हापूरला साधना इंजिनिअरिंग कंपनीत नोकरीला लागला.''
रविवारी दिवसभरात चौकशीसाठी आले नाही पोलिस
"एटीएस'ने शरद कळसकरला अटक केल्यानंतर त्याचे मूळ गाव केसापुरी प्रकाशाझोतात आले. दहशतवादाचे कनेक्शन या छोट्याशा गावाशी जोडले गेल्याने गावात सुन्न वातावरण आहे. गावातील कोणीच बोलायला तयार नाही. शरदच्या आई- वडिलांना अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत; मात्र ते "आमचा मुलगा अशा कृत्यात सहभागी असूच शकत नाही,' एवढेच उत्तर देत आहेत. रविवारी पहाटेच पोलिस पथक चौकशीसाठी येणार असल्याची चर्चा होती; परंतु कोणीही चौकशीसाठी आले नाहीत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.