विधानपरिषद निवडणूक : दहा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात

मविआ-भाजपमध्ये पुन्हा संघर्षाचे संकेत
Legislative Council elections mumbai Twelve candidates for ten seats mahavikas aghadi vs bjp Ramraje Naik-Nimbalkar Eknath Khadse
Legislative Council elections mumbai Twelve candidates for ten seats mahavikas aghadi vs bjp Ramraje Naik-Nimbalkar Eknath Khadsesakal

मुंबई : राज्यसभा निवडणुकीची लढाई संपण्यास काही तास बाकी असतानाच विधान परिषद निवडणुकीच्या नव्या संघर्षाला गुरुवारी प्रारंभ झाला. या निवडणुकीत चार जागा वाट्याला येणार असतानाही भाजपने सहा उमेदवार देऊन, महाविकास आघाडीविरोधात नव्या लढाईचे संकेत दिले. भाजपने सहाव्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांना पाठिंबा दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना रिंगणात उतरवले. तर काँग्रेसकडे एकाच जागेपुरते बळ असूनही दोन उमेदवार दिल्याने राज्यसभेप्रमाणेच विधानपरिषदेची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट आहे.

परिणामी, विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवारचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारी आपले अर्ज दाखल केले. भाजपकडून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि खोत यांनी आपले अर्ज दाखल केले. खोत यांना डावलल्याने त्यांची नाराजी ओढविण्याच्या शक्यतेने ऐनवेळी भाजपने खोत यांचा उमेदवारी दाखल केला.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्याआधी बुधवारीच आमदार प्रसाद लाड यांनी अर्ज दाखल केला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत नाईक-निंबाळकर, खडसे यांनी अर्ज दाखल केले. त्यापाठोपाठ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यसह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत या पक्षाचे चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांचे अर्ज आले. शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांनी बुधवारी अर्ज भरले आहेत.

राज्यसभेनंतर विधानपरिषदेसाठीही रणधुमाळी

मुळात संख्याबळानुसार भाजपकडे चार जागा जाऊ शकतात. तरीही या पक्षाने सहा उमेदवार निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट आहे. काँग्रेसकडील मतानुसार एकच जागा ते जिंकू शकतात; तरीही दुसऱ्या जागेसाठी भाई जगताप रिंगणात असतील तर सहाव्या जागेवरूनही महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये संघर्ष होणार असल्याचे तूर्त तरी दिसत आहे. परंतु, या निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याची मुदत १३ जूनपर्यंत असल्याने त्याचदिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. पण राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार युद्ध सुरू असल्याने विधानपरिषदेच्या निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, विधानपरिषदेच्या सर्व जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केला. तर महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असल्याचे सांगून भाजपला रोखण्याचा आघाडीच्या नेत्यांचा इरादा आहे.

एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षात कुणाच्याही नावाला विरोध नव्हता. एकमताने हा निर्णय पक्षाने घेतला आहे. बाहेर ज्या बातम्या आहेत त्या पूर्णपणे खोट्या व चुकीच्या आहेत.

- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com