Lend on mission mode Chief Ministers order
Lend on mission mode Chief Ministers order

मिशन मोडवर कर्ज द्या ; मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुढील महिना-दीड महिना महत्त्वाचा असून, खरिपात गुणवत्तापूर्ण बियाणे, खते पुरवठा करतानाच हंगामातील शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागविण्याची आवश्‍यकता आहे. ज्या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली आहे, अशांना नव्याने कर्ज मिळते की नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार विभागाच्या यंत्रणेची मदत घेऊन खरीप पीक कर्जपुरवठ्याचे जिल्हानिहाय नियोजन "मिशन मोड'मध्ये करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आज येथे पार पडली. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले,की या हंगामात शेतकऱ्यांना शेतीत गुंतवणुकीसाठी अर्थसाह्याची गरज भासते. त्यादृष्टीने पुढील दीड महिना आव्हानांचा आहे. शेतकऱ्यांना बॅंकांकडून कर्जपुरवठा मिशन मोडमध्ये करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

कृषी विद्यापीठांनी केलेले नियोजन प्रत्यक्षात येण्यासाठी यंत्रणेने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका ही योजना तयार करावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांना कृषी विभागासोबत प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या सूचना, केलेले नियोजन याबाबत जागरूक करावे. 

बियाणे व खतांचा पुरेसा साठा 

राज्यात खरीप हंगामासाठी लागणाऱ्या कपाशीसह सर्व बियाण्यांची व सर्व खतांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे. ज्या योजनेत शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला अशा योजनांच्या निधीमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे. कृषी यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, कांदाचाळ, शेडनेट, शेततळ्यांना अस्तरीकरण, कृषी प्रक्रिया या सर्व योजनांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. हवामान खात्यातर्फे चांगल्या पावसाचे भाकित व्यक्त करण्यात आल्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी सांगितले. 

गेल्या वर्षी 47 टक्के पीक कर्जवाटप करण्यात आले असून, 37 लाख 34 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचे सांगितले. यंदा 62 हजार 663 कोटींची पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

यंदा पाऊसमान चांगले.. 

हवामान विभागानुसार एप्रिलच्या पूर्वानुमानानुसार सरासरी 97 टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सून केरळपर्यंत कधी पोचेल त्याचा पूर्वानुमान 15 मेपर्यंत देता येईल त्यानंतर मान्सूनचे महाराष्ट्रात कधी आगमन होईल याचा अंदाज वर्तविण्यात येईल.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण विभागात 93 ते 107 टक्के, मध्य महाराष्ट्रात 103 ते 100 टक्के, मराठवाड्यात 89 ते 111 टक्के, विदर्भात 92 ते 108 टक्के पाऊस होण्याची शक्‍यता आहे, असे हवामान खात्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com