
Devendra Fadanvis: CM शिंदेंवर विश्वास नसल्याने फडणवीसांना पत्र; राऊतांचं मोठं वक्तव्य
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या विरोधी पक्षातील नेत्यांनी घोटाळे केल्याचा आरोप करत आहेत. अशातच ईडी विरोधी पक्षातील नेत्यांवर सतत धाडी टाकताना दिसून येत आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना आमदार राहुल कुल यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आणि घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राहून कुल यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचंही संजय राऊत म्हणालेत. संजय राऊत यांनी आज पुणे जिल्ह्यातील दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्रही लिहिलं आहे. तर विरोधी पक्षांच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आणणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला आहे.
या प्रकरणात सोमय्या मूग गिळून गप्प का बसलेत, असा प्रश्नही राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांचं हे पत्र आज राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं आहे. तर संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आतापर्यंत माझ्याकडे 17 कारखान्यांची प्रकरणे आहेत त्यातील ही पहिलं प्रकरण आहे. राज्यात काही विशिष्ट पक्षातील लोकांच्या मागे चौकशीचे सत्र लावता. मग आपल्या सोबतचे पक्षातले लोक आहेत त्यांच्या गैरव्यावहारावर कोण बोलणार? असा प्रश्न त्यांनी केला आहे.
तर पुढे बोलताना राऊत म्हणाले की, पाटस च्या भीमा सहकारी कारखान्याचे शेतकरी किरीट सोमय्या यांच्याकडे घेऊन गेले तर ते शेतकऱ्यांना म्हणतात की, जर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांचे काही घोटाळे असतील तर सांगा मी ते प्रकरण ईडीपर्यंत घेऊन जाईल असंही राऊत म्हणाले आहेत.
तर राहुल कुल यांच्याशी माझा काही वैर नाही काही संबंध नाही हे प्रकरण माझ्या समोर आलं आहे म्हणून मी यासंबधी पत्र लिहल आहे. या संबधी सर्व पुरावे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळतील. देवेंद्र फडणवीस काय करतील ते पाहू. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास नाही. त्यांचं सरकार घटनाबाह्य आहे. मला देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी त्यांना पत्र लिहल आहे असंही संजय राऊत यावेळी म्हणालेत.
पत्रात काय म्हणाले आहेत संजय राऊत?
संजय राऊत यांनी भीमा सहकारी साखर कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. याबद्दल केलेल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणाले, "भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवीत आहे. शेतकरी लुटला गेलाय हे स्पष्ट दिसते. ५०० कोटीचा मनी लाँडरिंग व्यवहार आहे. निःपक्ष चौकशीची आपल्याकडून अपेक्षा आहे."
संचालक मंडळाबद्दल माहिती देताना संजय राऊत म्हणतात, "आपल्या माहितीसाठी भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ पाठवीत आहे.. Pmla कायद्याने कारवाई व्हावी असे घोटाळे संचालक मंडळाने केलें आहेत व राजकीय वरदहस्त लाभला असल्याने ते बिनधास्त आहेत. शेतकऱ्यांच्या फसवणुकीस सरकारी पाठींबा आहे का? कारवाई करा!"
या कारखान्याचे चेअरमन भाजपा आमदार राहुल कुल आहेत. संजय राऊत यांच्याबद्दलच्या हक्कभंग समितीमध्ये राहुल कुल यांचाही समावेश आहे.