राळेगणसिद्धी - राज्यात लोकायुक्तांच्या नेमणुकीसाठी प्रत्येक राज्यात जनहित याचिका दाखल करा. राळेगणसिद्धी येथे न येता आपापल्या भागातील जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज देशभरातून येथे जमलेल्या कार्यकर्त्यांना केले.
अण्णा हजारे 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषण करणार आहेत. देशभरातून आलेल्या निवडक कार्यकर्त्यांची बैठक येथे झाली. या वेळी हजारे यांनी, आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले. ई-मेल व व्हॉट्सऍप ग्रुपद्वारे आंदोलनातील प्रत्येक दिवसाच्या घडामोडी कळविल्या जातील, असेही त्यांनी जाहीर केले.
आजच्या बैठकीस भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे विश्वस्त अजित देशमुख, ऍड. श्याम आसावा, अशोक सब्बन यांच्यासह भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील तरुण उत्पल (जम्मू काश्मीर), सुशील भट्ट व भोपालसिंग (उत्तराखंड), राम नाईक (कर्नाटक), मनीष भट्ट (गुजरात), कर्नल दिनेश नैन व कमांडर यशवंत प्रकाश (दिल्ली), सुनील लाल (बंगळूर), करण वीर (पंजाब), अक्षय कुमार (ओडिशा), शिवमकुमार शर्मा (मध्य प्रदेश), जगदीश सिंग (पंजाब), सुरेश पठारे, उपसरपंच लाभेश औटी, दत्ता आवारी, संजय पठाडे आदींसह सुमारे चारशे कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनीही आंदोलनाबाबत भूमिका मांडली.
'मुख्यमंत्री आता जागे झाले'
'मुख्यमंत्र्यांचा दोन दिवसांपूर्वी फोन आला होता. त्यांनी "लोकायुक्तां'चा कच्चा ड्राफ्ट मागितला आहे. गेली चार वर्षे त्यांना जाग आली नाही. आता ते जागे झाले,'' अशी टिप्पणी हजारे यांनी या वेळी केली. येत्या 29 तारखेला मुख्यमंत्री लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी एक समिती गठित करणार असल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना, त्यांना काय करावयाचे ते करू द्या, आम्ही आंदोलनावर ठाम आहोत, असे हजारे यांनी स्पष्ट केले.
राळेगणसिद्धी - आपल्या 30 जानेवारीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या देशभरातील कार्यकर्त्यांच्या बैठकीस मार्गदर्शन करताना अण्णा हजारे.
|