राळेगणसिद्धी - लोकपाल व लोकायुक्त कायद्याप्रमाणे विधानसभेत चर्चा करून लोकायुक्त अधिनियम 4 (3) प्रमाणे संशोधन समिती नेमून आपल्या राज्यात तरी लोकायुक्ताची नियुक्ती करावी, अशा मागणीचे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी पाठविले आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनेही लोकपाल कायद्याची अंमलबजावणी केली नाही. निवडणुकीपूर्वी लोकायुक्ताची नेमणूक करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सांगितले होते, असे नमूद करून हजारे यांनी, याच कारणासाठी नाइलाजास्तव मी 30 जानेवारीपासून उपोषण सुरू करत आहे,' असे पत्रात म्हटले आहे. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनाही हजारे यांनी पत्र पाठवून, सरकार खोटारडे असल्याचा आरोप केला आहे. हजारे यांना नुकतेच पंतप्रधान कार्यालयाचे पत्र मिळाले. त्याला उत्तर देताना हजारे यांनी म्हटले आहे, की लोकपाल कायदा होऊन पाच वर्षे होत आहेत. मात्र, सरकारला त्याची अंमलबजावणी जमली नाही. "लोकपाल'ला कमकुवत करणारा कायदा मात्र 2016मध्येच केला. त्यावरून सरकारचा खोटारडेपणा उघड होत आहे. शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव आणि कृषिमूल्य आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याच्या मागणीचा पुनरुच्चारही हजारे यांनी या पत्रात केला आहे.
|