मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला जेमतेम दोन दिवस शिल्लक असताना महिनाभरापूर्वी मतदान झालेल्या मुंबईतील "ईव्हीएम' यंत्रे ठेवलेल्या सेंटरविषयी मुंबई कॉंग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही यंत्रे ठेवलेल्या सेंटरच्या बाहेर कार्यकर्त्यांची सुरक्षा ठेवण्याबरोबच सेंटरमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या पासवर्डची मागणीही कॉंग्रेसने केली आहे. सेंटरमध्ये होणाऱ्या हालचालींवर दिवस-रात्र लक्ष ठेवण्याची आवश्यकता कॉंग्रेसने लिहिलेल्या या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी "ईव्हीएम' विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरवात केली आहे. एकीकडे "ईव्हीएम'बाबत दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा होत असतानाच मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि लोकसभेचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी "ईव्हीएम'च्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देवरा यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात "ईव्हीएम'बाबत गैरप्रकार केले जाण्याची शक्यता वर्तवली आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांना "ईव्हीएम' मशिन ठेवलेल्या सेंटरच्या बाहेर संशयास्पद हालचाली दिसून आल्याने सुरक्षेबाबत धास्ती वाटत असल्याची भीती त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.
"ईव्हीएम'मध्ये फेरफार करता येऊ नयेत यासाठी स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात यावी, अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे.
|