मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत निवडून येण्याची शक्ती असलेल्या नेत्यांनी मैदानात उतरावे, अशी अटकळ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाने बांधलेली असली तरी पक्षातील थोरा-मोठ्यांना लोकसभा नको वाटते आहे. राज्याच्या राजकारणातच या ज्येष्ठांचा जीव रंगल्याचे चित्र आहे. यामुळे 2014 प्रमाणेच यंदाही "राष्ट्रवादी'कडून नव्या युवा चेहऱ्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. मात्र, असे झाल्यास युवा चेहऱ्यांसाठी ही संधी नसून ज्येष्ठांच्या हटवादामुळे नाईलाज असल्याची चर्चा पक्षातील नेत्यांमध्ये आहे.
दोन दिवस चाललेल्या पक्षाच्या बैठकीत उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. 25 लोकसभा मतदारसंघाचा आढावा शरद पवार यांनी घेतला. या वेळी काही मतदारसंघात पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी मैदानात उमेदवार म्हणून उतरावे की कसे, यावरही चर्चा झाली.
पाटील, आव्हाड, रामराजेंची चर्चा...
सध्या प्रकाश आंबेडकर व ओवेसी यांनी आघाडी करत कॉंग्रेस-"राष्ट्रवादी'ला शह दिला आहे. त्यातच राजू शेट्टीदेखील या आघाडीत सामील होतील अशी अटकळ आहे. शेट्टी बहुजन वंचित आघाडीत सामील झाले तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच इचलकरंजी लोकसभेत उतरावे का, यावर पक्षाच्या नेत्यांनी चर्चा केली. कल्याण लोकसभेतून जितेंद्र आव्हाड यांना मैदानात उतरवण्याबाबतही चर्चा झाली. साताऱ्यात उदयनराजेंऐवजी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्या नावाचा विचार व्हावा, अशी मागणी पुढे आली आहे.
|