मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात समविचारी पक्षांच्या आघाडीसाठी प्रयत्न होत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जिथे शक्ती आहे तिथे जागा लढवण्याबाबत आढावा घेतला. अशा ठिकाणच्या उमेदवारांबाबत चाचपणी करण्यात आली असून, त्यावर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.
गेले दोन दिवस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघनिहाय पक्षाचा आढावा घेतला. आज या आढावा बैठका संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "पक्षाची शक्ती आहे, अशा सर्व लोकसभा मतदारसंघांबाबत शरद पवार यांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा केली. अनेक ठिकाणी उमेदवारांच्याबाबतीत सूचना देण्यात आल्या. योग्य वेळी या चर्चेनुसार निर्णय घेतले जातील,' असे पाटील यांनी सांगितले. आम्ही कोणत्या जागा लढवणार आणि कोणत्या नाही, याविषयापेक्षा ज्या मतदारसंघात आमची शक्ती आहे तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यामुळे संबंधित मतदारसंघात पक्षाने निवडणूक लढवावी की नाही, याचा निर्णय नंतर होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.
निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपचा पराभव करण्याचे उद्दिष्ट ठेवून सगळ्यांशी चर्चा केली. आम्ही घेतलेल्या आढाव्याच्या अनुषंगाने कॉंग्रेसबरोबर चर्चा करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
कुठलाही फॉर्म्युला नाही. निवडून येणे हाच त्याला एकमेव पर्याय आहे. कॉंग्रेस पक्षात व आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. दोघांचेही विचार एकाच दिशेने आहेत.
- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
|