युतीच्या ‘सस्पेन्स’मुळे नेत्यांच्या पोटात गोळा

Shivsena-Bjp
Shivsena-Bjp

मुंबई - लोकसभेची निवडणूक जेमतेम दोन महिन्यांवर येऊन ठेपली असतानाही भाजपसोबतच्या युतीबाबत काहीही हालचाल होत नसल्याने शिवसेनेच्या खासदार-आमदारांच्या पोटात गोळा आला आहे. 

आगामी निवडणुकीत एकटे लढण्याची वेळ आली, तर भाजपसोबत आमचेही नुकसान होणार असल्याची भीती शिवसेनेचे लोकप्रतिनिधी बोलून दाखवत आहेत. त्यामुळे युतीबाबत जानेवारी अखेरपर्यंत काय तो सोक्षमोक्ष लावून टाकण्याची मागणी शिवसेनेतून होत आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवरील हल्ले आणखी प्रखर केले आहेत. शिवसेनेच्या या टीकेला भाजपकडूनही प्रत्युत्तर येऊ लागले आहे. युतीसाठी कुणासमोर झुकणार नाही. मित्रपक्ष सोबत आले, तर त्यांना निवडून आणू. अन्यथा त्यांना पटक देंगे, असा इशारा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात लातूरमध्ये दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वबळावर ४० जागा निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना तयार राहण्याची सूचना केली आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनीही ‘युती गेली खड्ड्यात,’ असे विधान करून भाजपसमोर नमणार नसल्याचे सूचित केले आहे.

नेत्यांचा विरोध
शिवसेनेच्या नेतृत्वाकडून स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा होत असली, तरी त्या पक्षातील खासदार-आमदार त्यासाठी फारसे अनुकूल नाहीत. भाजपकडे केंद्रातील आणि राज्यातील सत्ता आहे. साधनसंपत्ती आणि सक्षम यंत्रणा असलेल्या भाजपशी दोन हात करणे सोपे नाही, अशी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची भावना आहे. ज्या नेत्यांचा लोकसभा निवडणुकीशी संबंध नाही आणि जे नेते वर्षानुवर्षे राज्यसभेची खासदारकी मिरवत आहेत, असे नेते युतीबाबत भाष्य करीत असल्याने शिवसेनेच्या खासदार-आमदारांमध्ये चीड आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनासोबत आली नाही, तर भाजपने शिवसेनेतील खासदार-आमदारांना आपल्याकडे वळविण्याची रणनीती तयार ठेवली आहे. जेथे प्रबळ उमेदवार नाही, अशा मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान खासदाराला अथवा नेत्याला निवडणुकीत उतरविण्याचे भाजपने ठरवले आहे. या रणनीतीनुसार नांदेड जिल्ह्यातील आमदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांच्याप्रमाणे विदर्भातील शिवसेनेचा एक खासदार भाजपच्या गळाला लागल्याचे समजते.

विधानसभेसाठी युतीचे घोडे अडले?
भाजपने लोकसभेसोबतच विधानसभेसाठीही युती तसेच जागावाटप जाहीर करावे आणि तसा प्रस्ताव द्यावा, अशी शिवसेनेची इच्छा आहे. मात्र, भाजपला आधी शिवसेनेच्या प्रस्तावाची प्रतीक्षा आहे. आजच्या घडीला लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांनी आधी प्रस्ताव द्यावा. हा प्रस्ताव दिल्लीला सादर केल्यानंतर युतीची अधिकृत चर्चा सुरू होऊ शकते. विधानसभा निवडणुकीला आणखी सहा-आठ महिन्यांचा अवकाश आहे. त्यामुळे विधानसभेबाबत आताच चर्चा होऊ शकत नाही, अशी भूमिका भाजपने घेतल्याचे कळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com