
Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीसांचा निवडणूक फंडा, एकट्या मुंबईसाठी 'इतके' हजार कोटी
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला आहे. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर स्थापन झालेल्या शिवसेना-भाजप युती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाकडून राज्यातील जनतेला मोठ्या आशा आहेत. मात्र मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी मुंबईसाठी मोठा निधी दिला आहे.
मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात शहरी भागातील नागरिकांना दिलासा देतानाच सरकारने कृषी क्षेत्रावर भर दिला आहे. मात्र मुंबईसाठी घोषित केलेल्या निधीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. फडणवीसांनी मुंबईसाठी एकून २ हजार ३१५.२ कोटी रूपयांचा निधी दिला आहे.
मुंबईच्या सुशोभिकरणासाठी : १७२९ कोटी रुपये
एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण
ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडणार: ४२४ कोटी रुपये
गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लब नजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण : १६२.२० कोटी
अजित पवारांची टीका-
या अर्थसंकल्पावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांची सुकाळ असणार हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
या सरकारने राज्यात आठ महिन्यांमध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या आणि त्याचीच पुनरावृत्ती आज अर्थसंकल्पामध्ये पाहिला मिळाले. हा अर्थसंकल्प विकासाचं पंचामृत आहे. ते कधी दिसणार नाही, फक्त ऐकत राहिचं आणि जनतेला स्वप्नांच्या दुनियेमध्ये फिरऊन आणण्याचा प्रयत्न करायचा २०१४ पासून यांनी केलेल्या घोषणांचं काय झालं अशा प्रश्न देखील अजित पवारांनी उपस्थित केला,
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं का, राज्यातून मोठ्या प्रमाणावर उद्योग बाहेर चालले आहेत. ते थांबवण्यासाठी कोणतीही घोषणा नाही, विकास कामांवर निधी खर्च होत नाही, म्हणत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे.