प्रदूषित गंगा नदीला म्हणा अर्थपूर्ण नमामि 

Nitin Gadkari
Nitin Gadkari

मुंबई : भारतीयांचे श्रद्धास्थान असलेली गंगा नदी शुद्ध करण्याच्या मोहिमेत नागरिकांना अंशदान देण्याचे आवाहन नमामि गंगे अभियानाचे प्रमुख केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार आहेत. शुद्धीकरण मोहिमेसाठी कोट्यवधींचा निधी लागणार असल्याने सरकारी प्रयत्नांना गंगामातेची भक्‍ती करणाऱ्या प्रत्येकाने फूल ना फुलाची पाकळी म्हणून हातभार लावण्याची मोहीम गडकरी मुंबई तसेच जगातील प्रमुख शहरांत राबवणार आहेत. भारतातील बड्या उद्योगपतींना आवाहन करतानाच परदेशस्थ भारतीयांकडून निधी उभारण्याची मोहीम तयार झाली आहे. 

नमामि गंगे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गडकरींवर सोपवली आहे. गंगा नदी अलाहाबादपासून सर्वाधिक प्रदूषित झाली आहे. प्रदूषणाची पातळी लक्षात घेत गंगासागरपर्यंत नदीचे नऊ भाग करण्यात आले आहेत. त्यातील एकेक भाग कॉर्पोरेट किंवा स्वयंसेवी संस्थांनी प्रदूषणमुक्‍त करावा, असे आवाहन गडकरी करणार आहेत. माता अमृतानंदमयी यांचे अनुयायी एका प्रदूषित पट्ट्याची जबाबदारी स्वीकारणार आहेत. ते या मोहिमेला 100 कोटींची आर्थिक मदत करणार आहेत. या मोहिमेत आता जनतेला सहभागी करून घेतले जाणार असल्याचे गडकरी म्हणाले.

प्रदूषित भागातील सुमारे साडेचार हजार खेड्यांत जनजागृतीचे काम केंद्रीय मंत्री उमा भारती करणार आहेत. यात गावकऱ्यांशी संपर्क, सांडपाण्याचे व्यवस्थापन अशा बाबतीत संवाद साधण्यावर भर दिला जाईल. पाण्याच्या पुनर्वापराचे सुमारे 150 छोटे मोठे प्रकल्प या भागात उभे केले जातील. घाट बांधण्याच्या मोहिमेसाठी सुमारे 2 हजार 215 कोटींची आवश्‍यकता आहे. नदीशी असलेले भावनिक नाते लक्षात घेता या मोहिमेसाठी जनतेतून निधी उभारला जाईल. पाटण्यात गंगा सर्वाधिक प्रदूषित होते आणि तेथे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सहकार्याने शुद्धीकरण प्रकल्प सुरू केला जाईल. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांना या मोहिमेत सामावून घेणारे प्रकल्प प्रारूप तयार झाले आहेत. नमामि गंगे अभियानाचे वैशिष्ट्य प्रशासनाला मदत करणारे नागरिक असेल, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले. नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य द्यावे असे आवाहन करणारे संकेतस्थळ, ऍप्स विकसित करण्यात येत आहेत. ब्रिटनमधील थेम्स नदी लोकसहभागानेच स्वच्छ आणि दिमाखदार झाल्याने परदेशस्थ भारतीयांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन अगोदर लंडनमध्ये केले जाईल. 

वृक्षलागवडीची जबाबदारी मुनगंटीवारांवर 
गंगेचे शुद्धीकरण करतानाच भविष्यात नदी आणि भोवतालचे पर्यावरण हरित राहण्यासाठी नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर 10 कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम नमामि गंगे अभियानाअंतर्गत राबवला जाणार आहे. या उपक्रमाचे प्रमुख अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार असणार आहेत. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झरखंड, बिहार आणि पश्‍चिम बंगालचे मंत्री या समितीचे सदस्य असतील. संरक्षण मंत्रालयाने उभारलेली ग्रीन आर्मी महत्त्वाची भूमिका बजावेल. गंगेचे दोन्ही काठ हिरवे करण्यासाठी थेट वाराणसीत मुनगंटीवार कार्यालय उभारणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com