आगामी निवडणुकांत कॉंग्रेसशीच आघाडी 

आगामी निवडणुकांत कॉंग्रेसशीच आघाडी 

मुंबई - ""आगामी निडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस समविचारी पक्षासोबतच युती करण्यासाठी तयार असल्याचे सांगत कॉंग्रेससोबत आघाडी होणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री व "राष्ट्रवादी'चे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सूचित केले. पक्षाच्या नेत्यांनी मनातला संभ्रम काढून टाकावा. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजपला पाठिंबा देणार नाही. गुजरातमध्येही कॉंग्रेससोबतच आघाडीची बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोनदिवसीय चिंतन शिबिर कर्जत (जि. रायगड) येथे आयोजित करण्यात आले आहे. या वेळी पटेल यांनी भाजपवर कडाडून टीका केली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवारसह सर्व नेते, माजी मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख कार्यकर्ते शिबिराला उपस्थित होते. 

अटलबिहारी वाजपेयी यांनी सरकारमध्ये "राष्ट्रवादी'ने सहभागी व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, धर्मनिरपेक्षता व लोकशाहीवादाला प्राधान्य देत शरद पवार यांनी त्या वेळी नकार दिला; अन्यथा त्याचवेळी भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळात पवार यांना दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले असते, असा गौप्यस्फोट पटेल यांनी या वेळी केला. 

दरम्यान, संभ्रमावस्थेतून जाणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने या चिंतन शिबिरात पक्षाची भविष्यातील दिशा स्पष्ट केली आहे. पक्षबांधणीबरोबरच सत्ता टिकवण्यासाठी भाजपला पाठिंबा नाही, 2019 मध्ये कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याचे आदी मुद्दे "राष्ट्रवादी'ने शिबिराच्या पहिल्या दिवशी स्पष्ट केले. या शिबिराचा समारोप शरद पवार यांच्या भाषणाने होणार आहे. त्यामुळे पवार या सर्व मुद्यांवर काय भूमिका घेतात, तेही महत्त्वाचे आहे. 

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात जनमत होत असताना भाजपच्या एकाधिकार सत्तेच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एक होत आहेत. देशातील या बदलत्या राजकीय परिस्थितीत 2019 मध्ये शरद पवार यांना सर्व पक्षांचे समर्थन मिळून त्यांना पंतप्रधान होण्याची संधी आहे, असा विश्वासही पटेल यांनी व्यक्त केला. 

"खुल्या मनाने काम करावे' 
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष 2014 मध्ये एकत्र लढले असते तर दोघांच्या मिळून 130 ते 140 जागा निवडून आल्या असत्या, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. कॉंग्रेस आपला शत्रू नाही; पण दोन्ही पक्षांत "कभी खुशी कभी गम' असे संबंध आहेत; पण आपल्याला आता खुल्या मनाने काम करावे लागेल, असे सांगून आगामी काळात कॉंग्रेससोबत आघाडीचे संकेत पटेल यांनी दिले. 

शेतकऱ्यांची अवस्था बिकट - तटकरे 
""सत्तांतर होऊन तीन वर्षांचा कालावधी झाला आहे. या तीन वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून अजूनही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेली नाही,'' अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या वेळी केली. ते म्हणाले, ""सरकारने शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ऑनलाइन अर्जात चुकीची माहिती भरली तर फौजदारी कारवाई केली जाईल, असे सरकार म्हणते. शेतकऱ्याने चुकीने माहिती भरली तर त्याच्यावर कारवाई होईल, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.'' आतापर्यंत हे सरकार भाजपचे सरकार आहे, शिवसेना त्यांच्यामागे फरफटत जात आहे. सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाविरोधात शिवसेना प्रखर टीका करते. जे निर्णय प्रक्रियेत आहेत तेच मोर्चा काढतात, आंदोलन करतात. ही विसंगती जनतेपर्यंत पोचवली पाहिजे. सोशल मीडियावर सरकारचे सुरवातीला कौतुक होत होते. मात्र, मागील काही महिन्यांपासून सरकारविरोधात वातावरण तयार झाले आहे. याचा लाभ घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे आवाहनही तटकरे यांनी या वेळी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com