तुरीची विक्रमी 67 लाख 35 हजार क्विंटल खरेदी 

तुरीची विक्रमी 67 लाख 35 हजार क्विंटल खरेदी 

मुंबई - राज्यात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेल्या तुरीची केंद्र आणि राज्य शासनाकडून 67 लाख 34 हजार 756 क्विंटल एवढ्या विक्रमी प्रमाणात खरेदी करण्यात आली आहे. विविध केंद्रांवर तीन लाख 54 हजार 417 शेतकऱ्यांकडून तीन हजार 401 कोटी रुपये किमतीची तूर खरेदी करण्यात आली असून, त्यांना तीन हजार 341 कोटी 32 लाख रुपयांची देणी वितरित करण्यात आली आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने कळविले आहे. 

तुरीची किमान आधारभूत किंमत 2016-17 या वर्षासाठी केंद्राच्या 425 रुपयांच्या बोनससह प्रतिक्विंटल एकूण 5050 रुपये ठरविण्यात आली होती. या किमान आधारभूत दराने राज्यात 15 डिसेंबर 2016 पासून 12 जून 2017 या कालावधीत केंद्र सरकारमार्फत किंमत स्थिरता निधी अंतर्गत 51 लाख 69 हजार 40 क्विंटल आणि राज्य शासनामार्फत बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत 15 लाख 65 हजार 716 क्विंटल अशी एकूण 67 लाख 34 हजार 756 क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. "नाफेड', "एफसीआय' व "एसएफएसी'च्या वतीने पणन महासंघ, विदर्भ पणन महासंघ व महाएफपीसी या संस्थांमार्फत तूर उत्पादक जिल्ह्यांमधील 323 खरेदी केंद्रांवर ही खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित 59 कोटी 36 लाख रुपयांची देणी वितरित करण्याची प्रक्रिया गतीने सुरू आहे. 

त्याचप्रमाणे राज्यातील तूर खरेदी केंद्रावर 31 मे 2017 पर्यंत टोकन देण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यासंदर्भातील शासन निर्णय आजच काढण्यात आला आहे. मात्र या तुरीची खरेदी करताना ती शेतकऱ्यांची आहे की व्यापाऱ्यांची याची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. 

67 लाख 34 हजार 756 क्विंटल  - तुरीची सरकारकडून खरेदी 

3 लाख 54 हजार 417  - शेतकरी 

3 हजार 341 कोटी 32 लाख रुपये  - शेतकऱ्यांना देणी वितरित 

323  - केंद्रांवर खरेदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com