मुंबई : राज्यातील आगामी निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे लढविणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि भाजप सोबत लढवणार असल्याचे जाहीर केले. ‘‘महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत.
यापुढील काळात सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढवू आणि बहुमताने जिंकू,’’ असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
या भेटीविषयी अधिक माहिती देताना शिंदे म्हणाले, कृषी, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत.
राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली.’’
मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लवकरच
जवळपास ११ महिने उलटल्यानंतरही मंत्रिपदावर वर्णी लागत नसल्याने शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांमध्ये असंतोष वाढत असल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लवकर काढावा लागेल, यावर दिल्लीत चर्चा झाल्याचे समजते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रविवारी (ता.४) रात्री उशिरा दिल्लीत भेट घेतली. यात प्रामुख्याने मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे फार काळ ठेवता येणार नसल्याच्या मुद्यावर एकमताने चर्चा झाली.
गेल्या जुलै महिन्यात मुख्यमंत्री शिंदे सत्तारूढ झाल्यानंतर भाजप व शिंदे गटाचे प्रत्येकी दहा आमदारांना मंत्रिपदे मिळाली. परंतु भाजप, शिंदे व अपक्ष मिळून विधानसभेत १६२ जण आहेत. त्यापैकी केवळ २० जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. १४२ जणांपैकी अनेकांना मंत्रिपदाचे गाजर देण्यात आले होते.
मंत्रिमंडळात आणखी २३ जणांची वर्णी लागू शकते यामुळे १२० आमदार पुन्हा नाराज होणार आहे. परंतु तब्बल ११ महिने उलटल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे पुढे जात नसल्याने आमदारांच्या संयमाचा बांध फुटण्याची वेळ आली आहे.
शिंदे गटाचे ४२ आमदार आहेत. काही अपक्षांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहेत. यात प्रहारचे बच्चू कडू व अपक्ष आमदार आशीष जयस्वाल यांचाही समावेश आहे. बच्चू कडू तर ठाकरे सरकारमध्येही मंत्री होते, आता ते प्रतीक्षा यादीत आहेत. त्यांनी सरकारवर अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे.
काही मंत्र्यांना घरचा रस्ता
या विस्तारात काही मंत्र्यांना घरी बसावे लागण्याची शक्यता आहे. यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची नावे या यादीत अग्रभागी असल्याचे समजते. या दोन्ही मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करून सरकारपुढे अडचणी निर्माण केल्या आहेत.
अपात्रतेच्या निर्णयाचे काय?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिंदे गटातील १६ सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार आहे. हे कारण पुढे करून खरे तर मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकण्यात येत होता. या १६ पैकी तानाजी सावंत, सांदिपान भुमरे व अब्दुल सत्तार या तिघांना मंत्रिपदे मिळाली आहेत.
भरत गोगावले यांच्या मुख्य प्रतोदावर प्रश्नचिन्ह आहे. या मुद्याचाही या विस्ताराच्यावेळी विचार करण्यात येईल. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्यापुढे नाराजांना सोबत ठेवण्याची कठीण परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. आमदारांच्या नाराजीने उग्र रुप घेण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यावर आता गांभीर्याने विचार सुरू झाला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.