मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा महाविकास आघाडी सरकारने सूडाच्या भावनेतून काढून घेण्यात आली असल्याबाबत या सर्व आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि राज्यातील सर्व पोलिस आयुक्तांना पाठविले आहे.
त्याचबरोबर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सर्व आमदारांना मुंबईत पवार आल्यावर पाहून घेऊ, अशी धमकी दिल्याची तक्रारही या पत्रात केली आहे. राज्य सरकारने या गोष्टींची गंभीर दाखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. केवळ राजकीय आकसापोटी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने ही सुरक्षा काढून घेण्यात आली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीचे अनेक नेते त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बंडखोर आमदारांच्या विरोधात चिथावणी देत हिंसा घडवू पाहत आहेत. त्यातच गृहमंत्रालयाने आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतली आहे. त्यामुळे भविष्यात एखादी अनुचित घटना या आमदारांच्या बाबतीत किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या बाबतीत घडल्यास त्याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असेल, असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे.
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. आमदारांची व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.
- एकनाथ शिंदे, बंडखोर नेते
एकाही आमदाराची सुरक्षा काढण्याचे आदेश अथवा सूचना मुख्यमंत्री अथवा गृहविभागाने दिलेले नाहीत. तसा कोणताही निर्णय झालेला नाही. जे सुरक्षा काढली असे सांगत आहेत ते राज्याची दिशाभूल करत आहेत.
- दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.