शिवसेनेला हव्यात राज्याच्या सर्व भागांत निवडून येणाऱ्या जागा
मुंबई - शिवसेनेला राज्याच्या सर्व भागांत निवडून येण्याची खात्री असलेल्या जागा हव्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आपापल्या पक्षाचे अस्तित्व जपण्यासाठी दोन्ही पक्षांनी मतदारसंघशः लक्ष घालणे सुरू केले आहे. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांबद्दलच्या आपापल्या याद्या, तसेच मागण्या भाजप- शिवसेनेने परस्परांना कळवल्या आहेत.
आकड्यांबद्दल वेगवेगळे दावे- प्रतिदावे करण्याऐवजी निवडून येण्याची हमी असलेल्या जागांची निवड हे उभय बाजूंचे सूत्र आहे. शिवसेनेने गेल्या निवडणुकीत केवळ 62 म्हणजेच भाजपेक्षा अर्ध्याने कमी जागा जिंकल्याने त्यांना जागानिवडीत जरासे झुकते माप हवे असल्याचे समजते.
भाजपलाही मराठवाड्यात तसेच कोकणात स्वतःचे अस्तित्व वाढवायचे असल्याने त्यांचा या भागाबाबत काहीसा आग्रह आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपला फारसे स्थान नव्हते; पण "मेगा प्रवेशां'मुळे ती चिंता आता मागे पडली आहे. शिवसेनेला महाराष्ट्राच्या शहरी भागात पुणे, नाशिक, नागपूर या महानगरांत कोणत्याही जागा जिंकता आल्या नव्हत्या, तेव्हा या महापालिकांत त्यांना किमान एक तरी जिंकता येणारा मतदारसंघ हवा आहे. भाजपसाठी ज्याप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यात एकही आमदार नाही, तसेच या महापालिका हद्दीत आमचे झाले आहे, असे शिवसेनेने कळवल्याचे समजते.
जागांचे आकडे समसमान दाखवणे ही आमची गरज असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे, तर उद्धवजींनी आमची अडचण समजून घ्यावी, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीरपणे नमूद केले आहे. मित्रपक्षांसाठी 18 जागा वेगळ्या ठेवण्यावर दोघांचेही एकमत झाले आहे. उरलेल्या 270 जागा अर्ध्या वाटून घेणे ही "मीडिया चर्चा' म्हणत उडवून दिली गेली असली तरी शिवसेनेच्या सन्मानासाठी तसे करता येईल काय, याचा अभ्यास सुरू असल्याचे एका ज्येष्ठ भाजप नेत्याने स्पष्ट केले. जिल्हावार उपस्थितीचा विषय आज शिवसेनेच्या मंत्र्यांसमोर उद्धव ठाकरे यांनी नमूद केल्याचे समजते.
|