Vidhan Sabha 2019 : राज्यात निवडणूक प्रचाराला रंग चढला

1) घनसावंगी - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचार सभेत बोलताना माजी केंद्रीय कृिषमंत्री शरद पवार. 2) कोल्हापूर - विधानसभेच्या प्रचारासाठी रविवारी तपोवन मैदानावर झालेल्या महायुतीच्या सभेत बोलताना गृहमंत्री अमित शहा.
1) घनसावंगी - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचार सभेत बोलताना माजी केंद्रीय कृिषमंत्री शरद पवार. 2) कोल्हापूर - विधानसभेच्या प्रचारासाठी रविवारी तपोवन मैदानावर झालेल्या महायुतीच्या सभेत बोलताना गृहमंत्री अमित शहा.

विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले.

युतीचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष - पवार
घनसावंगी (जि. जालना) -
 पाच वर्षांत सत्ता असूनही शिवसेना-भाजपने शेतीसह शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ केले नाही. त्यामुळे पाच वर्षांच्या काळात १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी घनसावंगी येथे रविवारी केली.

घनसांवगी  मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, की शेतीमालाला भाव नाही, उसाला कर्ज नाही, विहीर-शेतीवर कर्ज घेतले तर जप्तीची कार्यवाही होते, त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. फडणवीस सांगतात की शेतकऱ्यांना पन्नास हजार कोटींचे आर्थिक बजेट दिले आहे. खरेतर त्यांनी शेतकऱ्यांना कर्जबाजारी केले, त्यांच्याकडे शेतकऱ्यांना देण्याची दानत नाही. कृषिमंत्री असताना ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. या सरकारने कर्जमाफीला ऑनलाइन कचाट्याबरोबर विविध निकषांत टाकले. मुंबईतील शिवस्मारकाच्या कामाचा पाच वर्षांपूर्वी प्रारंभ झाला. मात्र, अजूनही वीट टाकली गेली नाही. इंदू मिलमधील डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्‍नही रेंगाळलेला आहे, असे शरद पवार म्हणाले.

आमच्यामुळे राज्याची प्रगती - शहा 
कोल्हापूर -
 एकेकाळी सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राची काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पंधरा वर्षांच्या काळात पीछेहाट झाली; पण गेल्या पाच वर्षांत सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पुन्हा आघाडी घेतली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. 
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तपोवन मैदानावर झालेल्या सभेत शहा बोलत होते. शहा म्हणाले, ‘‘ २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वावर भरोसा ठेवून तुम्ही मोदी यांची झोळी ‘कमळा’च्या फुलांनी भरून दिली, त्याबद्दल आभार मानण्यासाठी मी येथे आलो आहे.

तुमच्यामुळेच मोदी देशभरात तीनशेपेक्षा जास्त जागा जिंकू शकले. ७० वर्षे देशाची जनता काश्‍मीरचा भाग भारतात कधी येईल या विवंचनेत होती. मोदी यांनी काश्‍मीरमध्ये लागू केलेले ३७० कलम उखडून टाकत हा भाग भारताला जोडण्याचे काम केले.’’ 

शरद पवार केंद्रात दहा वर्षे होते, त्या वेळी महाराष्ट्राच्या विकासाला १ लाख १५ हजार कोटी रुपये दिले. मोदी सरकार आल्यानंतर आम्ही २ लाख ८६ हजार ३५४ कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. याशिवाय विविध योजनांच्या माध्यमातून ४ लाख ३२ हजार कोटी रुपये महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिले आहेत, असे शहा म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com