Vidhan Sabha 2019 : ‘भाजपचा विकास जाहिरातींपुरताच’ - शरद पवार

Sharad-Pawar
Sharad-Pawar

विधानसभा 2019 : विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या मूळ प्रश्‍नावरच लढली जात आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद आणि काश्‍मीरचे राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याचा मुद्दा प्रमुख केलेला असला, तरी महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. भाजपच्या भपकेबाज प्रचाराला ती बळी पडणार नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांची झळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाला बसली आहे. सरकारची कामे जाहिरातीतच दिसताहेत. प्रत्यक्षात मात्र विकास गायब आहे. त्यामुळे २००४ मध्ये तत्कालीन भाजप सरकारचा ज्या पद्धतीने ‘शायनिंग इंडिया’च्या जाहिरातीने अनपेक्षित पराभव झाला होता, तशी स्थिती महाराष्ट्रात आहे. निकालाच्या दिवशी महाराष्ट्रातल्या भाजपची अवस्था ‘शायनिंग इंडिया’सारखी होईल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्‍त केला. ‘सकाळ’चे प्रतिनिधी संजय मिस्कीन यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत पवार बोलत होते. त्याचा हा अंश...

प्रश्‍न - निवडणुकीचा आत्तापर्यंत जो प्रचार झाला, त्यातून तुम्हाला काय अंदाज येतोय?
पवार -
 लोकसभा निवडणुकीवेळी ज्या प्रकारे वेगळे विषय होते, तसे विषय या निवडणुकीत नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीवेळी भारताच्या सीमेवर दहशतवादी शक्ती कार्यरत होत्या. त्याला आवरण्यासाठी देशाचे सैन्य तयारी करीत होते. आम्हा सर्व विरोधी पक्षांची बैठकदेखील केंद्र सरकारने बोलावली होती. मीही होतो. सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीमेवरील दहशतवादी कारवायांची ठिकाणे दाखवली होती. आमच्यासमोर सादरीकरणच केले होते.

तिथे नेमके काय काय सुरू आहे, ते दाखवले. आम्ही एकमताने ठराव केला, की भारतीय सैन्य दल आणि हवाई दलाने जी काही पावले टाकायचीत ती टाकावीत. त्यानुसार जी कारवाई हवी होती, ती भारतीय जवानांनी केली. सीमा सुरक्षित केल्या. पण, या सर्व घटनांचा अन्‌ लोकसभा निवडणुकीचा संबंध नसताना भाजपने तो जोडला. दहशतवादावर कारवाईचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांनी ठराव करून घेतला. पण, भाजप आणि मोदी यांनी असे वातावरण तयार केले, की दहशतवादी तळावर जी कारवाई केली ती भाजपमुळेच केली. हल्ले करण्याची भूमिका फक्‍त भाजपचीच होती, असा प्रचार केला. त्याचा राजकीय लाभ त्यांना लोकसभा निवडणुकीत मिळाला.

पण, यापूर्वीदेखील भारतीय सैन्यांनी अनेकदा विजय मिळविले. इंदिरा गांधींनी तर पाकिस्तानचे दोन तुकडे करून जगात नवा देश जन्माला घातला. जगाचा भूगोल बदलला. पण, त्याचे त्यांनी कधीही राजकीय श्रेय घेतले नाही. या वेळी मात्र मोदी आणि भाजपने सैन्यदलाच्या कारवाईचे राजकीय श्रेय घेतले. आता महाराष्ट्राच्या निवडणुकीत हा विषय लोकांच्या मनात आहे, असे चित्र कुठेही दिसत नाही.

प्रश्‍न - पण, भाजपचे सर्व नेते प्रचारात कलम ३७० हाच प्रमुख मुद्दा असल्याचे सांगताहेत. त्याला लोकांचा प्रतिसाद नाही, असे म्हणायचे आहे काय? 
पवार -
 त्यांनी कोणता मुद्दा प्रमुख करायचा, हा त्यांचा प्रश्‍न असला; तरी राज्यातल्या जनतेचा तो मुद्दा नाही. कलम ३७० हटविण्यास कोणाचाही विरोध नव्हता. फक्‍त, काश्‍मीरच्या जनतेला विश्‍वासात घेऊन लोकशाही मार्गाने ते हटवावे, अशी सर्वांची भूमिका होती. पण, विरोधक म्हणजे पाकिस्तानचीच भाषा बोलतात, हा खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करता येणार नाही. जनतेसमोर आज बेरोजगारीची भीषण समस्या आहे. युवकांना काम नाही. उद्योग बंद पडताहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढताहेत. बॅंकांमध्ये लोकांच्या ठेवी सुरक्षित राहतील की नाही, ही भीती आहे. शेतीविकासाचा दर खुंटलाय. केंद्र सरकारच्या आयात-निर्यातीच्या धरसोडीच्या धोरणाने शेतीमालाचे भाव कोसळून शेतकऱ्यांचा बळी जातोय.

राज्यातली गुंतवणूक कमालीची घटलीय. पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक उद्योग बंद पडलेत. आहेत ते कसेबसे तग धरून आहेत. महाराष्ट्रातली जनता सरकारला हे प्रश्‍न विचारत आहे. युवक बेरोजगारीबाबत आक्रमक आहेत. पण, सरकार सर्व प्रश्‍नांपासून पळ काढण्यासाठी काश्‍मीर आणि ३७० कलम, असे भावनिक मुद्दे उपस्थित करीत आहे. मुख्यमंत्र्यांना बेरोजगारांनी आणि शेतकऱ्यांनी जाहीर सभेत याचा जाब विचारला, तर ते ‘भारतमाता की जय’च्या घोषणा देतात, हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेय. तेव्हा ही निवडणूक जनतेने जनतेच्या मूळ प्रश्‍नावर हातात घेतली आहे. मला ठाम विश्‍वास आहे की, या वेळी महाराष्ट्राचा युवक, शेतकरी, कामगार आणि महिला सरकारच्या विरोधात मतदान करणार आहेत. भाजपला ‘शायनिंग इंडिया’सारखा दणका देण्याचे मत जनतेने बनवलेय.

प्रश्‍न - आपण महाराष्ट्रभर फिरत आहात. युवकांच्या प्रतिसादाचे चित्र आहे. पण, त्याच्या मतांमध्ये रूपांतरासाठी आघाडीकडे काय यंत्रणा आहे?
पवार -
 मी पन्नास वर्षे राजकीय जीवनात वावरतोय. सध्या युवकांमध्ये सरकारबद्दल जो रोष दिसतोय, तो यापूर्वी कधीही जाणवला नाही. मुळातच, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे. साक्षरता आणि सर्वसमावेशकता हा इथल्या युवकांचा मूळ स्वभाव आहे. महाराष्ट्राच्या मातीत संत एकनाथ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लहूजी वस्ताद, संत सेवालाल, संत बसवण्णा, भगवानबाबा, शाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांसारख्या लोकहितवादी विचारांचा पगडा आहे. त्यांच्या विचाराने इथला तरुण जगलाय, वाढलाय. त्यामुळे प्रचारात भाजपने कितीही भपकेबाजपणा आणला, तरी त्यांचा बेगडीपणा तरुणांना चांगलाच समजलाय. धार्मिक कट्टरतावाद महाराष्ट्राच्या मातीत रुजला नाही. बंड करून उठण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. अन्‌ येत्या २१ तारखेला राज्यातला प्रत्येक युवक या विचाराने मतदान करून भाजप-शिवसेनेच्या उन्मादी सत्तेविरुद्ध बंड करणार, याची मला खात्री आहे.

प्रश्‍न - महाराष्ट्राच्या मातीत बंड करण्याची धमक आहे; म्हणजे तुमच्यावर ‘ईडी’च्या कारवाईनंतर ज्या प्रकारे प्रतिक्रिया उमटली तो याचाच भाग होता, असे वाटते काय? 
पवार -
 खरेतर माझ्यावर ‘ईडी’ने ज्या प्रकारे गुन्हा नोंदविला, तो हास्यास्पद आहे. मी ज्या बॅंकेचा कधीही संचालक राहिलो नाही, तरी मला टार्गेट केले, याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटली. याचाच अर्थ, राज्यातल्या जनतेला खरे काय अन्‌ खोटे काय, याची जाणीव आहे. खरा प्रश्‍न आहे तो, ‘ईडी’सारख्या यंत्रणांचा विरोधकांना दाबण्यासाठीच राजकीय वापर केला जाऊ शकतो, हे या सरकारने पहिल्यांदा दाखवायला सुरवात केली. आम्हीही अनेक वर्षे सत्तेत होतो. पण, अशा संस्थांचा राजकीय वापर कधी केला नाही. या सरकारने मात्र विरोधकांना दाबण्यासाठी बिनदिक्‍कतपणे यंत्रणांचा दुरुपयोग सुरू केलाय. त्याबद्दल जनतेच्या मनात राग आहे. अन्‌ सत्तेविरोधातला हाच राग राज्याची जनता दाखवून देण्यासाठी आतुर असल्याचे दिसतेय.

प्रश्‍न - या निवडणुकीत ‘पैलवान’ हा शब्द परवलीचा बनल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्रीदेखील सतत ‘पैलवान’चा उच्चार करीत भाषणे देताहेत. यामागचे नेमके काय रहस्य?
पवार -
 ‘पैलवान’ या शब्दाला मी महत्त्व देत नाही. पण, राजकारणात अशाप्रकारची भाषा बोलायची काही जणांची पद्धत असते. मुख्यमंत्री म्हणतात की, आमचे पैलवान लंगोट व तेल लावून तयार आहेत. पण, लढायचं कोणासोबत? समोर कोणच पैलवान नाही? मला हे ऐकून हसूही येते, आश्‍चर्यदेखील वाटतेय. अशाप्रकारची भाषणे ऐकून जनतेची करमणूक होते. मुख्यमंत्री स्वत:ला पैलवान समजत असतील, तर मला त्याबद्दल काही हरकत नाही. पण, त्यांनी लक्षात ठेवावे की, ते पैलवान असतील तर मी महाराष्ट्र कुस्ती परिषदेचा अध्यक्ष आहे. राज्यातील सर्व पैलवानांची शिखर संस्था आहे ही कुस्ती परिषद. अन्‌ समोर कोणीच नसेल, असं त्यांना वाटत असेल; तर मग दिल्लीतून अख्खे केंद्रीय मंत्रिमंडळ महाराष्ट्रात कशाला आलेय? पंतप्रधान मोदी, अमित शहा गावोगावी सभा कशासाठी घेताहेत, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांकडे असेल तर जरूर द्यावे.

प्रश्‍न - पण, आज राष्ट्रवादीतले बहुतांश नेते तुम्हाला सोडून गेलेत; त्याचे कारण काय?
उत्तर -
 कारण एकच, सत्ता. जे नेते गेले त्यांना फक्‍त सत्ता हवी आहे. लढण्याची हिंमत हरणारी माणसे सत्तेसोबत जातात. त्यांनी पंधरा वर्षे आमच्याकडे राहून सत्तेचा लाभ घेतला. ते सत्तेबाहेर राहूच शकत नाहीत. पण, वाईट एका गोष्टीचे वाटते, की तुम्ही ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलात, त्या पक्षावर लोकांनी विश्‍वास दाखवून निवडून दिलेले असते. हे पक्षांतर असे मानले जात असले; तरी ज्या जनतेने मतदान केले त्या मतदानाचा, अर्थात जनतेचा अनादर आहे. ते गेले, त्यांचे त्यांना लखलाभ असो. आम्ही नव्या युवा चेहऱ्यांना सोबत घेऊन संघर्ष करू. महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही तरुण होतो, तेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी आम्हाला संधी दिली. ती केवळ सत्ता म्हणून नव्हे; तर महाराष्ट्रात पंचवीस वर्षांनंतरचे नेतृत्व उभे राहावे म्हणून दिली. आम्हाला नेतृत्व म्हणून त्यांनी उभे केले. आता मी पुढील पंचवीस वर्षांनंतर महाराष्ट्राला नेतृत्व देतील असे तरुण घडविण्याचे काम हाती घेतले आहे. माझी जबाबदारी तीच आहे. राज्य चालविणारी नवी पिढी तयार करणे, ही नैतिक जबाबदारी आहे.

प्रश्‍न - महाराष्ट्राची सत्ता पुन्हा युती सरकारकडे गेली, तर पुढच्या पाच वर्षांनंतरचा महाराष्ट्र कसा असेल?
पवार -
 सध्याचे वातावरण पाहता पुन्हा महाराष्ट्राची जनता युतीला सत्ता देणार नाही. पाच वर्षांत प्रथम क्रमांकाचा महाराष्ट्र या सत्तेने मागे नेवून ठेवलाय. सामाजिक सलोखा राहणार नाही, या प्रवृत्तीने कारभार सुरू आहे. एककेंद्री नेतृत्वाने लोकशाहीला वेसण घालण्याची कार्यपद्धती आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मतदार पुन्हा भाजप-शिवसेना युतीला सत्ता देणार नाही, याचा मला विश्‍वास आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com