Vidhansabha 2019 : कोकण : युतीची कळ कोकणाच्या हाती

Konkan
Konkan

विधानसभा 2019 : शिवसेना-भाजप युतीचे निश्‍चित झाले, असे सांगितले जात असले तरी युतीची कळ या वेळी कोकणातून फिरणार, असे वातावरण आहे. भाजपप्रवेशाची घोषणा स्वतः नारायण राणे यांनीच केली. पाठोपाठ ‘नाणार रिफायनरी’चा फेरविचार करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले. भाजपकडून शिवसेनेच्या जखमेवर हे मीठ चोळण्यासारखे होते. 

रायगडपासून सिंधुदुर्गपर्यंत विधानसभेच्या १५ जागा आहेत. कोकणातला शिवसेनेचा पट्टा रायगड-सिंधुदुर्गच. त्यात महाडही येऊ शकते. आजच्या घडीला युतीवर शिवसेनेचे यश अवलंबून आहे. रायगडातील सातपैकी श्रीवर्धन, पेण व अलिबाग हे मतदारसंघ आघाडीकडे राहू शकतात; तर महाड, उरण आणि पनवेल युतीकडे असे ढोबळमानाने म्हणता येईल. कर्जत दोलायमानच राहणार. युती मोडली तर शिवसेनेचे कर्जत आणि उरण येथील उमेदवार अडचणीत येऊ शकतात. रत्नागिरीत शिवसेनेचे वर्चस्व आहे. भास्कर जाधव यांनी शिवसेनेत उडी घेतल्याने शिवसेनेचे बळ वाढले.

आघाडीची ताकद चिपळूण वगळता इतरत्र नाही. ‘राष्ट्रवादी’चे संजय कदम दापोलीतून निवडून आले असले, तरी त्यांची मदार फाटाफुटीवर राहिली आहे. या वेळी भाजपला पाचपैकी दोन मतदारसंघ हवेत. हे होणे कठीणच दिसते.

युतीचा निर्णय राज्यस्तरावर झाला, तर स्थानिक भाजप नेत्यांना गप्प बसावे लागेल. रत्नागिरी, राजापूर, गुहागर या मतदारसंघांत शिवसेनेला चिंता नाही. दापोलीत पक्षांतर्गत दुफळी त्रासदायक आहे. चिपळूणमध्ये राष्ट्रवादी तुल्यबळ आहे. युती झाली तर ते अधिक सोपे ठरू शकते; मात्र युती मोडली तर शिवसेनेला अपशकून करण्याएवढी संख्यात्मक ताकद भाजपने मिळवली आहे. 

सिंधुदुर्गात स्वतः नारायण राणेच गेल्या वेळी पराभूत झाले. तोपर्यंत राणे फॅक्‍टर जोरदार होता. शिवसेनेने राणेंना दिलेला हा धक्काच होता. नितेश राणे विजयी झाले, तर केसरकरांच्या विजयाने राणेंना आणखी बॅकफूटवर ढकलले. सिंधुदुर्गातील त्यांची ताकद क्षीण होत असताना त्यांचा भाजपप्रवेश युतीच्या भवितव्याची कळ ठरू शकतो. युती झालीच तर नितेश राणे यांना निवडून येताना फार मोठी लढत द्यावी लागेल; मात्र स्वतः नारायण राणे मैदानात उतरले तर सिंधुदुर्गातील लढतीस कलाटणी मिळू शकते. 

रायगडमध्ये आघाडीचा आटापिटा
जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना-भाजपला शह देण्यासाठी रायगड जिल्ह्यात एकत्र आलेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची (शेकाप) आघाडी अद्याप कायम आहे. या एकीच्या बळावरच येणारी विधानसभा निवडणूक लढविण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे; तर शिवसेना-भाजप यांच्यातील युतीबद्दल ठोस निर्णय होताना दिसत नाही. रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघांत शेकापचे प्रभुत्व होते. राष्ट्रवादीनेही श्रीवर्धन, कर्जत-खालापूर मतदारसंघात आपली पकड कायम ठेवली; परंतु युतीचा वाढता प्रभाव या दोन्ही पक्षांना कठीण जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com