
NCP Leader: "शिंदे सरकार फार काळ टिकणार नाही"; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं भाकीत
राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अनेक विषयावर दिलीप वळसे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
ते म्हणाले की, "राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. तरी देखील राज्य सरकारकडून नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, कर्मचाऱ्यांच्या संपाचे कारण सांगून पंचनामे झालेले नाहीत सांगितल जातं. सर्व सरकारी यंत्रणा ठप्प आहे. लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी. यासाठी प्रयत्न करणार असून याबाबत विधानसभेत आवाज उठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
"राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान होत असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना गांभीर्य नाही. केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचल्या जात नाहीत, सरकार फक्त राजकारण करण्यात व्यस्त आहे" असा आरोप वळसे पाटलांनी केला आहे.
तर आमदारांच्या अपात्रतेवर बोलताना म्हणाले, शिंदे-ठाकरे गटाबाबत सुप्रीम कोर्ट काय निकाल देईल, याचा अंदाज बांधणे योग्य नाही.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सगळं अलबेल नाही. हे सरकार फार काळ टीकेल , असे वाटत नाही. सरकार जो पर्यंत चालेल तो पर्यंतच चालेल एक दिवस सरकार पडेल. भाजप- शिंदे गटातील आमदारांच्या मनातील भावना जरा अवघड दिसत आहेत," असे वळसे पाटलांनी सांगितले.
दरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह गारपिठांचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान राज्यामध्ये पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
वादळी पावसाचा इशारा देत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.