मुंबई - गेली 52 वर्षे मी शिवसेनेत आहे, माझं वय आता 81 पूर्ण झालं आहे, त्यामुळे मला आता राजकारणातून निवृत्त होऊ द्या. माझा शिवसेनेचा राजीनामा स्वीकारा, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या समक्ष स्वतःची कैफियत मांडली. शिवाजी मंदिरमध्ये आज मनोहर जोशीलिखित पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मी सगळी पदे भूषवली, मला पाहिजे ते मिळालं. बाळासाहेबांनी जे प्रेम दिलं, तेच उद्धव ठाकरेंनी दिलं, त्यामुळे मी संतुष्ट आहे. आता नव्याने पुढे येत असलेल्या पिढीला संधी मिळायला हवी असे सांगत, आता आम्हाला प्रशासनाचा अनुभव नाही, आम्ही रस्त्यावरचे राजकारणी, अशी खंतही जोशी यांनी या वेळी व्यक्त केली. दरम्यान, नितीन गडकरी अनुपस्थित राहिल्याबद्दल कोटी करताना जोशी म्हणाले, की नितीनजी या कार्यक्रमाला आले नाहीत, नकारात्मक मानसिकतेने हे सरकार आलेलं आहे. या वेळी उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या शिवसेनेतील निष्ठेचे आभार मानताना सरांसारख्या नेत्यांची निवृत्ती निव्वळ अशक्य आहे, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले. सरांनी राजकीय निवृत्ती घेण्यापेक्षा सतत राजकीय दिशा दाखवणारी पुस्तकं लिहीत राहावे, असा सल्ला त्यांनी दिला. त्याचवेळी शिर्डी संस्थानने राज्य सरकारला दिलेल्या 500 कोटी रुपयांच्या सहकार्याचे उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. साईंचा खजिना राज्याच्या विकासासाठी खुला झाल्याने निळवंडेसारखा रखडलेला प्रकल्प होऊन लाखो शेतकऱ्यांचे जीवन सुखकारक होईल, अशा शब्दांत त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
|