मुंबई - "गेले 22 वर्षे मी मराठा आरक्षणासाठी लढतोय, हीच भाजपची पोटदुखी आहे. मी ओबीसी असूनही मराठा बांधवांसाठी आरक्षण मागतोय म्हणूनच भाजप जातीयवादाचे गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल पटलावर ठेवण्यास विरोधी पक्षांनी आजही भूमिका मांडली. त्यामुळे दोनदा सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यांनतर जेव्हा सभागृह सुरू झाले, तेव्हा भाजपचे सभागृहातील नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी "धनंजय मुंडे आणि इतरांविरुद्ध आरक्षणविरोधी आरोप केला. दरम्यान, विधान परिषदे दिवसभरासाठी तहकूब झाल्यानंतर धंनजय मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारला धारेवर धरले. "गेल्या 22 वर्षांपूर्वी मी बीड जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना प्रथम मराठा आरक्षणाची मागणी केली होती आणि हा मुद्दा आजतागायत लावून धरला आहे; हे सकल मराठा समाजाला ज्ञात आहे. विधान परिषदेतदेखील गेल्या चार वर्षांत शेतकरी कर्जमाफी, मराठा-लिंगायत-धनगर-मुस्लिम आरक्षणाबाबत मी सातत्याने मुद्दे लावून धरलले आहेत. भारतीय जनता पक्षाला मी ओबीसी असल्याने मराठ्यांसाठी आरक्षण मागतोय, हे बघवत नाही म्हणून ते माझ्या विरोधात घोषणा देत आहेत. संघाच्या विचारधारेवर चालणार, हे फसवे सरकार जातीयवादाचे गलिच्छ राजकारण करत आहे', असे धनंजय मुंडे म्हणाले.
|