सरकार अस्वस्थ..! 

सरकार अस्वस्थ..! 

मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने आगडोंब उसळलेला असल्याने सरकार अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. प्रशासन व पोलिस विभागातही तणावाचे वातावरण असून मुख्यमंत्री एकहाती कारभार हाताळत असल्याने मंत्री व आमदारांतही नाराजीचा सूर आहे. सलग तिसऱ्या दिवशी विविध भागांत हिंसक घटना घडत असताना मुख्यमंत्री शांत होते. आज मुंबईसह प्रमुख शहरात पोलिस विरुद्ध आंदोलक यांच्यात सरळ संघर्ष झाल्याने कायदा व सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण झाल्याचा अहवाल गृहविभागाने दिला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला हात जोडून दिलगिरी व्यक्‍त केली. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेचे पहिल्यांदा आवाहन करत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांसोबत चर्चेची तयारी दर्शविली. 

आषाढी एकादशीच्या अगोदरपासून राज्यभरात विविध शहरांत ठोक आंदोलनाची तयारी सुरू होती. अनेक ठिकाणी जागरण गोंधळ, ठिय्या आंदोलन सुरू होते. मात्र, सरकारला यामध्ये समन्वय साधण्यात अपयश आल्याची चर्चा सत्ताधारी मंत्री व आमदारांमध्येही सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्या वादग्रस्त विधानामुळे आंदोलक अधिकच संतप्त झाल्याचे मानले जाते. दरम्यान, आषाढी वारीत मुख्यमंत्र्यांना पूजा करण्यापासून रोखल्यानंतर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावणे. पालकमंत्र्यांना मराठा समन्वकांच्या सोबत चर्चा करण्यास सांगणे अभिप्रेत असल्याचा दावा जाणकार करत आहेत. मात्र, या सर्व पातळीवर सरकार सपशेल अपयशी झाल्याने हा आगडोंब उसळल्याचा आरोप होत आहे. विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत कितीही मतभेद असले तरी अशा संवेदनशील प्रसंगी बैठक बोलावून आंदोलकांच्या रोषाला रोखणे शक्‍य होते, असे प्रशासनातील तज्ज्ञांचे मत आहे.

नेतृत्व अपयशी - शिवसेना
या संपूर्ण आंदोलनात केवळ भारतीय जनता पक्षाच्या सरकारलाच आंदोलकांनी लक्ष्य केले नाही, तर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदार खासदारांनाही ‘टार्गेट’ केले आहे. त्यामुळे, एकहाती आंदोलन हाताळण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न अपयशी झाल्याचे सूतोवाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या निवेदनातील अनेक घटनांमधे तथ्य असल्याचे कबूल करत शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com