भाज्यांचा आरोग्य उत्सव ! 

residentional photo
residentional photo

श्रावण संपला. भाद्रपदाला सुरुवात झाली. पावसाळ्याच्या दुसऱ्या पर्वाची नांदी असते ही. ऋतूचा विचार करून आहार, विहार आणि ऋतू परत्वे मिळणाऱ्या विविध वनस्पतीच्या भाज्यांचा वापर हा सर्वांगीण आरोग्यासाठीचा उत्सव असतो. त्याविषयी..... 
 

    पावसानंतरचे आताचे आहेत दिवस. या दिवसात जठराग्नी श्रावणाच्या उपवासाने वाढायला सुरुवात होते. पचनशक्ती ही वाढू लागते. भाद्रपदमध्ये हळू-हळू आहार वाढवून निसर्गात येणाऱ्या विशेष फळ भाज्यांचा वापर आहारात करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यायोगे शारीरिक शक्ती बळ वाढेल. हरितालिकापासून विविध फळभाज्या तसेच पानांच्या भाज्या खाण्याची विशेष प्रथा बऱ्याच प्रांतात आहे. ती आरोग्याच्या हेतूने. विशेष भाज्या खाण्याचे महत्व शास्त्रामध्ये आहे.

  भाज्याचा काही प्रांतात नैवैद्य गौरीला दाखवतात. काही हरितालिकानिमित्ताने खायला सुरुवात केली जाते. पावसाळा असल्याने आरोग्यदृष्ट्या अनेक भाज्या वर्ज्य केल्या जातात. त्या सर्व रुचकर, पुष्टीकर आरोग्यवर्धन करणाऱ्या भाज्या खाण्याची सुरवात हरितालिकापासून होते. गौरीपासून ती पुढे सरावते. भाज्यांचा विचार केल्यास लक्षात येईल की, पावसाळाच्या दुसऱ्या सत्रातील आरोग्य राखणे आणि शरीराला बळ देणे हा संकल्प दडलेला आहे.

दोडके, गिलके, डांगर (काळ्या पाठीचा) दुधी, कारले, तोंडली, चवळीच्या शेंगा, माठ, फरसबी, चाकवत, भेंडी, सिमला मिरची, गवार, काकडी, हदगा व पडवळ मुखत्वे करून भाज्यामध्ये समाविष्ट आहे. देश, प्रांत परत्वे काही भाज्या बदलतात. पण गाभा मात्र तोच दिसतो. कोकणात सुरण, मुळा, आळू व शेवग्याची पाने (शेकटची भाजी) याचा समावेश असतो. घरातील प्रत्येक व्यक्तीचे सर्वोतोपरी उदरभरण, शरीरस्थ धातूपुष्ठी, मनाची तृप्ती करण्यासाठी भाज्यांची प्रथा व्रतानिमित्ताने शास्त्राने सांगितली आहे. 

हृदय-फुफ्फुसाला मिळते बळ 
दुधी भोपळा वाढलेला कफ-पित्त कमी करणारा, हृदयाला बळ देणारा आहे. डांगर कृमी कमी करणारी (पावसाळ्यात शरीरामध्ये कृमीचे प्रमाण वाढते) फळभाजी असून फुफ्फुसासाठी उत्तम टॉनिक आहे. सध्या प्रथिने वाढवण्यासाठी वेगळा अनैसर्गिक आहार घेतला जातो. मुळातच, डांगर हे फळ आताच्या उष्णतेमुळे कमी होणारी लघवी मोकळी करण्यास मदत करते. श्रावण घेवडा श्रावणातील खास भाजी होय.

पालेभाज्यामधील एक श्रेष्ठ भाजी चाकवत. गोड असून भूक वाढवणारी, पचनशक्ती सुधारणारी, पचायला हलकी, प्लीहेला-यकृताला उत्तेजित करून त्यांचे कार्य सुधारणारी आहे. कर्कटश्रुंगी अथवा काकडी थंड असून मल व स्त्राव बांधणारी आहे. म्हणून आताच्या ऋतूमध्ये आले, मिरे टाकून भाजी म्हणून अथवा नुसती सेवन करायला उत्तम. पावसाळ्यात वाढणारी उष्णता कच्ची काकडी कमी करते. कारले कडक मल प्रवृत्तीला कमी करणारे असून पोटातील वायू कमी करणारे आहे. रक्त शुद्ध करून पांडू रोग कमी करणारी भाजी आहे.

  गिलके उष्णता कमी करून मुरूम पुटकुळ्या, तारुण्य पिटीका यावर रक्त शुद्ध करून कार्य करते. भूक वाढवते, आम्लपित्त कमी करते. दोडके पित्त नाशक अन्‌ प्रतिकारक्षमता वाढवणारे आहे. पडवळ फळ भाज्यांमधील श्रेष्ठ भाजी. गोड असून रक्तविकार, यकृत विकार व हृदयाला उत्तम. हदग्याची भाजी मधुमेहासाठी, जुनाट तापावर, थकव्यावर , हृदय रोगावरील उत्तम टॉनिक आहे. शेवगा कृमीनाशक असून डोळ्यांसाठी उत्तम आहे. वातनाशक असून पचायला हलका आहे. भेंडी पचायला हलकी असून हृदय व मधुमेहासाठी उत्तम आहे.

लाल माठ स्निग्ध गुणाची रक्त वाढवणारी, हृदय प्लीहेवर गुणकारी, गर्भाशयाला बळ देणारी आहे. गोवर, पित्त व वातनाशक, लघवी प्रमाण वाढवते व रक्तशुद्धी करते. मुळा पचायला हलका, चव आणणारा पचनशक्ती वाढवणारा तुपासह सेवन केल्यास त्रिदोषनाशक आहे. मुळव्याधीमध्ये सुरण गुणकारी तर आळू चव आणून कृमीनाश करणारा पचनाशक्ती वाढवणारा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com