मुंबई - "लॉंग मार्च'मधील शिस्तबद्ध मोर्चेकऱ्यांच्या सगळ्या मागण्या कालबद्धरीतीने सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आजच्या आज निर्णय घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली.
विधानसभेचे सदस्य पतंगराव कदम यांचे नुकतेच निधन झाल्याने आज कामकाज सुरू झाल्यावर शोकप्रस्ताव हेच कामकाजात होते. तरीही काही विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांनी यांनी ठोस निवेदन करावे, अशी मागणी विरोधी पक्षातील सदस्यांनी शेतकरी मोर्चाच्या बाबतीत केली.
यावर मुख्यमंत्री म्हणाले, की शेतकऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढला. त्यांचे विषय महत्त्वाचे असल्याने त्यांना सर्वांचा पाठिंबा आहे. आम्ही सरकार असल्याने समर्थन देऊ शकत नाही, तर प्रश्न सोडवू. आम्ही समिती निर्माण केली आहे. त्यानुसार कालबद्ध पद्धतीने त्यांच्या मागण्या पूर्ण करू.
यापूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे म्हणाले, की शोक प्रस्ताव महत्त्वाचा असला, तरी शेतकरी मोर्चाही महत्त्वाचा आहे. सरकारने या शेतकऱ्यांच्या मागण्यांवर आजच निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा. "नाशिकचे पालकमंत्री या मोर्चेकऱ्यांना सहा दिवसांपूर्वीच भेटले होते. त्यांनी त्या दिवशीच चर्चा करून हा प्रश्न सोडवायला हवा होता. शेतकरी पायी अनवाणी चालत आज मुंबईत धडकले आहेत,' असे सांगत अजित पवार यांनी सरकारवर टीका केली. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनीही, सरकारने समिती नेमली असली, तरी ताबडतोब निर्णय घ्यावा, असा आग्रह धरला होता.
|