प्रबोधनकारांचा वारसा सांगणारा पक्ष उरला 'नाटका' पुरता

Shiv Sena
Shiv Sena

शिवसेनेच्या काळात 'असे होते - तसे होते', असे सांगणारे आज नाक्या- नाक्यांवर व चौका चौकात भेटतात. 1995 चा शिवशाहीचा काळ आज लोकं आठवणीने सांगतात. त्यावेळी म्हणे 'शेतकऱ्यांचे काम फक्त त्यांच्या गळ्यात असलेले भगव्या टाॅवेल-उपरणे किंवा गमजा म्हणा हे बघून व्हायचं. त्याला कुणा पुढाऱ्याला फोन करायची गरजच भासायची नाही,' असे सांगणारे लोक गावागावात भेटतील. मग आता नेमका कुणाचा काळ आहे?, असा प्रश्न सामान्यांना पडला तर नवल वाटायला नको.

एकंदर आजच्या घडामोडी पाहता शिवसेनेला भूतकाळातच रमावे लागणार असल्याचे दिसते आहे. राज्याच्या सत्तेत सहभागी होण्यासाठी सहा महिने उशिर करणाऱ्या शिवसेनेने अगोदरच उशिर केला आहे. नाही होय करत शिवसेना सत्तेत सहभागी झाली. यामुळे शिवसेनेला पाच कॅबिनेट तर सात राज्यमंत्रीपदांचा वाटा मिळाला. पण सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेना इमानेइतबारे विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे.

राज्यातील सत्तेत असलेल्या आपल्या मंत्र्यांच्या विरोधातच शिवसेनेच्या आमदारांनी तक्रारी केल्या होत्या. राज्यात पक्ष वाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी 'शिवसंपर्क' चा घाटही घातला होता. मात्र, 'शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय अर्थसंकल्प मांडू देणार नाही,' या आपल्या भूमिकेवरुन शिवसेनेने घूमजाव केला. ही शिवसेनेच्या राजकारणातील सगळ्यात मोठी चूक ठरण्याची भिती आहे. दुसरीकडे राजिनामा खिशात घेऊन फिरणाऱ्या मंत्र्यांना मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारमधून बाहेर पडावेसे वाटत नाही, ही स्थिती आहे.दुसऱ्या बाजूला पक्षप्रमुख मात्र 'हिम्मत असेल तर मुदतपूर्व निवडणुक घ्या' असे आव्हान देतात. पण सरकारमधून बाहेर मात्र पडत नाहीत. वाघाचे चिन्ह मिरवणाऱ्या आक्रमक पक्षसंघटनेला इतकी हतबलता यावी यापेक्षा वाईट काय आहे.

अगदी मरेस्तोवर मार खाऊनही शिवसेना न सोडलेले कित्येक तरूण मी पाहिले आहेत. पण तेही आता उघड उघड पक्षाच्या विरोध बोलत आहेत. आमदारच नाही तर सामान्य शिवसैनिकही पक्षाच्या धरसोडीच्या धोरणांमुळे कंटाळले आहेत. आमदारच आपले काम होत नसल्याचे गाऱ्हाणे मांडत आहेत पण लक्षात कोण घेणार?येणाऱ्या काळात लढाऊ शिवसेनेचा सूर्य धरसोड वृत्तीमुळे आणि ठाम भूमिका न घेण्यामुळे मावळतो की काय, अशी गंभीर परिस्थिती असताना 'मातोश्री'वर मात्र शांतता आहे. हीच शांतता शिवसैनिकांच्या मनात अस्वस्थता वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. अशा वेळेस पक्षप्रमुख मात्र नाटकात रमत असतील तर प्रबोधनकारांचा वारसा अन् बाळासाहेबांचा बाणा सांगणारा पक्ष उरला 'नाटका' पुरताच असेच नाईलाजाने नमूद करावे लागणार आहे.

काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणात?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com