पुणे - 'केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महाराष्ट्राला घेता यावा, यासाठी राज्यात पाचसदस्यीय समिती स्थापन करण्यात येईल. त्यांच्या शिफारशींनुसार राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात येतील,'' असे राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी सांगितले.
पुणे विभागीय आयुक्तालयाच्या मुख्य सभागृहात राज्यस्तरीय विभागीय जिल्हा वार्षिक योजना प्रारूप आराखडा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला अर्थ व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्यासह कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा आणि पुण्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपस्थित होते.
अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले, 'अर्थसंकल्पात घोषित केल्यानुसार देशात तीन लोकसभा मतदारसंघांमागे एका वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करणे, रेल्वेच्या सोयींमध्ये मुंबईतील लोकलसेवा, स्टेशन नूतनीकरणासाठी लाभ होणार आहे. शेतमालावर प्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी त्याचा फायदा होणार आहे. गरिबांना मोफत वीजजोड, गॅसजोडणी देण्याची योजना राबविण्यात येईल. केंद्राच्या निधीत राज्याचा हिस्सा वाढावा यासाठी केंद्राच्या योजनांचे प्रस्ताव वेळेत व वेगाने करण्याची यंत्रणा उभारण्यात येईल त्यानुसार अर्थसंकल्पाची दिशा राहील. रोजगार, आरोग्य, शेती, शिक्षण, पाणी आणि पायाभूत सुविधा पूर्ण करण्याचा संकल्प राहील.''
शेअर मार्केट आज कोसळले असले तरी उद्या पुन्हा वेगाने उसळी घेईल. अर्थसंकल्पामुळे मार्केट कोसळले असे नाही. अन्य कोणत्याही कारणांमुळे ते कोसळतेच. त्यामुळे उद्या पुन्हा मार्केट वधारेल.
- सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री
|