सरकारचे दोनच लाभार्थी एक भाजप दुसरे उद्धव ठाकरे : राधाकृष्ण विखे पाटील

Opposition
Opposition

नागपूर : सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. या सरकारचे दोनच लाभार्थी आहेत, एक म्हणजे भाजप आणि दुसरे उद्धव ठाकरे. सरकारच्या तीन वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्या, जाहिरातबाजी, नेत्यांचे घोटाळे झाले असून, या तीन वर्षांत राज्याचे वाटोळे झाले, अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत विखे-पाटील बोलत होते. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित होते. विखे-पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, शेतकरी कर्जमाफी म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावाने सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरही राज्यातील 1500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना या सरकारने कर्जमाफीची खोटी प्रमाणपत्र दिली आहेत. तसेच आता डेमेज कंट्रोलसाठी सरकार बँकेत पैसे टाकत आहे. शेतकऱ्यांना खुलेआम लुटण्याचे लायसन्स सरकारने व्यापाऱ्यांना दिले. 'मनी वसे ते ट्विटी दिसे' अशी पक्षाची सध्या स्थिती झाली आहे. ओखी आणि या सरकारमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे दोन्ही गुजरात मार्गे आले.

यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे गरज पडेल तेव्हा बाहेर पडणार असे सांगत आहेत. मात्र, गरज कोणाची आहे हेच कळत नाही. शेतकऱ्यांची गरज आहे की सरकारची. बीटी म्हणजे बी फॉर बीजेपी आणि टी फॉर ठाकरे असे सध्या आहे. सध्या राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, गुन्हेगारीत राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर असेही ते म्हणाले. 

यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, तीन वर्षांत सर्व घटकांवर अन्यायकारक घोषणा होऊनही कर्जमाफी झाली नाही. हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी झाले असून, कर्जमाफीचा घोळ हा 'इनोहो' या कंपनीमुळे झाला आहे. सरकारने या कंपनीला कंत्राट दिले होते.

ते पुढे म्हणाले, कापूस उत्पादकांचे तीस हजार कोटींचे नुकसान झाले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी 25 हजार नुकसान भरपाईची मागणी या अधिवेशनात करणार आहे. तसेच सर्व स्तरावर सरकारचा खोटारडेपणा जनतेच्या लक्षात आला आहे. सरकारने संपूर्ण कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी रकमेसहित अधिवेशनात ठेवावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

माहिती व तंत्रज्ञान विभाग हा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला असून, महाराष्ट्रात पारदर्शकता वेडी झाली आहे. मागील सरकारच्या योजनांच्या लाभार्थींना त्यांनी आमच्या सरकारचा लाभार्थी म्हणून सांगितले आहे. भ्रष्टाचारमुक्त करणाऱ्या सरकारने राज्य भ्रटाचारयुक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांचे मोबाईल तपासले तर फरार मुन्ना यादव कुठे लपून बसलाय हे कळेल, असेही मुंडे म्हणाले.

तसेच मुख्यमंत्री खरचं पारदर्शी असतील तर ज्या मंत्र्यांच्या विरोधात घोटाळ्यांचे आरोप आहे. त्या मंत्र्यांवर चौकशी लावावी, अशी मागणीह त्यांनी केली.

दरम्यान, सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com