मुंबई - महाराष्ट्रात सध्या सर्वत्रच अस्वस्थता असून, आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मराठा, धनगर व लिंगायतांना सरकारने काय दिले असा थेट सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश मंडळांना सरकारच्या जाचक नियमामुळे येत असलेल्या अडचणींबाबत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. राज्यात सध्या प्रचंड अस्वस्थता असून, सरकार मात्र कोणत्याही वर्गाचे अथवा समाजाचे समाधान करू शकत नसल्याची भावना आहे. असे स्पष्ट करताना ठाकरे म्हणाले, की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग हे सरकार देऊ शकत नाही. मराठा, धनगर व लिंगायतांना आरक्षण देऊ शकत नाही. एवढंच काय, हिंदूंच्या सणांसाठी सुरक्षित कायदे व नियमपण देऊ शकत नाही. हिंदूंच्या सणासाठी जो तो उठतो तो न्यायालयात जातो अन् सरकार गप्प राहते, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली.
मंत्रिमंडळ टेंपररी असते; पण कर्मचारी पर्मनंट असतो, असा टोला लगावताना ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.
दरम्यान, हिंदूंच्या उत्सवाच्या आड येऊ नका, असा इशारा देत प्रत्येक गोष्टीत न्यायालयाकडे बोट दाखवू नका. ऍट्रासिटीचा न्यायालयाने दिलेला निकाल बदललाच ना? मग हिंदूंच्या सण-उत्सवासाठी का थांबलात, असा थेट सवाल ठाकरे यांनी केला. आमचा उत्सव कसा साजरा करावा हे कायदेपंडितांनी सांगू नये, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
हिंदूंच्या सण व उत्सवाच्या आड कायदे येत असतील, तर रस्त्यारस्त्यांवर महाआरती करू. गणपती उत्सवातल्या मंडपांचा त्रास होत असेल, तर मेट्रोच्या कामाचा त्रास होत नाही काय? हिंदूंच्या सणांवर गंडांतर आणताना भान ठेवा, असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मराठा, धनगर व लिंगायतांना सरकारने काय दिले?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग हे सरकार देऊ शकत नाही. मराठा, धनगर व लिंगायतांना आरक्षण देऊ शकत नाही. एवढंच काय, हिंदूंच्या सणांसाठी सुरक्षित कायदे व नियमही देऊ शकत नाही.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
|