मुंबई - देशभरात मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणावर आधारित धार्मिक वर्गीकरण करणारा "एमआयएम' हा पक्ष भारतीय जनता पक्षाचे काम करत आहे. मतांचे धार्मिक विभाजन करणे हाच एक भाजपपुरस्कृत अजेंडा "एमआयएम' राबवत असून, "एमआयएम' एकप्रकारे भाजपची "बी' टीमच असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज केली.
टिळक भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांत "एमआयएम'सोबत कोणत्याही ठिकाणी आघाडी करणार नाही. भाजप व शिवसेनेसोबतच "एमआयएम'ही जातीयवादी पक्ष असून, भाजपला सोयीची भूमिका हा पक्ष घेत असल्याचे ते म्हणाले. भाजपचे कंत्राट घेऊन "एमआयएम'चे काम सुरू असल्याचा टोलाही चव्हाण यांनी लगावला.
मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडीची शक्यता चव्हाण यांनी फेटाळून लावली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने या अगोदरच उमेदवारांची यादी जाहीर केली असल्याने आता आघाडीची चर्चा होऊच शकत नाही. त्यातच मुंबईतल्या बहुतांश कॉंग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबतच्या आघाडीला विरोध केल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या हटवादीपणामुळे आघाडी होण्याची शक्यता मावळल्याचा आरोप केला.
|