मुंबई - पसंत असणारी मुलगी पळवून आणण्याची ग्वाही देणारे भाजपचे नेते, आमदार राम कदम यांची सर्व स्तरावरून झालेली टीका आणि स्वपक्षानेदेखील कानपिचक्या दिल्याने अखेरीस तीन दिवसांनंतर जाहीर माफी मागितली. राजकीय पक्षांबरोबर सामाजिक संघटनांनीदेखील राम कदम यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतल्यानंतर ट्विटरवरून त्यांना जाहीर माफी मागणे भाग पाडले गेले. मात्र, कदम यांची माफी नाही, तर राजीनामा घेतला पाहिजे, यावर विरोधक ठाम आहेत.
राम कदम यांनी घाटकोपर येथे दहीहंडीच्या दिवशी मुलींना पळवून आणण्यास मदत करण्याचे बेताल वक्तव्य केले होते. यावरून संताप व्यक्त करण्यात आला. राज्यात अनेक ठिकाणी कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करणारी आंदोलने झाली. महिला संघटनांनीही कदम यांच्याविरोधात रोष व्यक्त केला होता. मात्र, आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे वारंवार सांगत कदम यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. "माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला, त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली. झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च माता-भगिनींचा आदर करीत मी माफी मागत आहे, ' असे ट्विट राम कदम यांनी केले आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. महिला आयोगाने राम कदम यांना नोटीस पाठविली असून, सात दिवसांच्या आत याबाबत त्यांच्याकडून खुलासा मागवला आहे. तसेच, भाजपनेही कदम यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते. त्यामुळे कदम यांनी अखेर आज ट्विटरवरून माफी मागितली.
|