
Sharad Pawar: '५० खोके, नागालँड ओके' ठाकरेंच्या शैलीत मनसेची राष्ट्रवादीवर टीका
भाजपला नुकत्याच पार पडलेल्या तीन राज्यांच्या निवडणुकीत चागंलंच यश मिळालं आहे. त्यापैकी, नागालँडच्या निकालात एनडीपीपी आणि भाजप यांच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळाल आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील इतर २ पक्षांनीही जागा मिळवल्या आहेत. यामध्ये रामदास आठवलेंच्या आरपीआयने 2 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 7 जागांवर विजय मिळवला आहे.
नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप सरकारला इतर छोट्या पक्षांनीही पाठिंबा दिला. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी सत्तेत जाण्याचा आग्रह धरल्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादीच्या या पाठिंब्यावरुनच मनसेने राष्ट्रवादीच्या भूमिकेवर खोचक टीका केली आहे.
नागालँडचे राष्ट्रवादीचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीत स्थानिक नेत्यांच्या मागणीवर चर्चा करण्यात झाली. त्यानंतर बैठकीत नागालँड सरकारला पाठिंबा देणार यावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं.
नागालँडमध्ये राष्ट्रवादीने घेतलेल्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसवर आता राज्यात टीका केली जात आहे. याबाबत शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली तरीही, राष्ट्रवादीवर विरोधकांकडून टीका होतं आहे. मनसेचे नेते गजानन काळे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत राष्ट्रवादीला लक्ष केलं आहे. हे राष्ट्रवादीचे सत्तेचे प्रयोग असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
व्हिडिओमध्ये काय म्हणालेत गजानन काळे?
राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सरकार बनविण्यासाठी पाठिंबा दिलाय म्हणे, पवारसाहेब है तो मुमकीन है. आता भारतीय जनता पक्षाची ढ, ब का ड टीम राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणावं का? अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीला पवारसाहेबांचा पाठिंबा होता, ह्या देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर शिक्कामोर्तब झालं आहे का, असे प्रश्न मनसेचे नेते गजानन काळे यांनी केले आहेत. तर आता, एक नवीन पान-सुपारी सम्राट कोण हे महाराष्ट्राने ओळखावं अशी टाकाही काळे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.
आमचा पाठिंबा भाजपला नसून नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना आहे - शरद पवार
आमचा पाठिंबा भाजपला नसून नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. नागालँडमध्ये भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने पाठिंबा दिला नाहीत तरी त्यांना सरकार बनवायला अडचण येणार नाही. नागालँडमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष आहे.