Raj Thackeray : दुकानांवरील 'मराठी पाट्यांबाबत SCच्या निर्णयानंतर राज ठाकरेंची भली मोठी पोस्ट; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raj Thackeray

Raj Thackeray : दुकानांवरील 'मराठी पाट्यांबाबत SCच्या निर्णयानंतर राज ठाकरेंची भली मोठी पोस्ट; म्हणाले...

महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी मुंबईतील सर्व व्यापाऱ्यांना मराठीत सूचनाफलक लावणे बंधनकारक केले होते. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मुंबईतील व्यापाऱ्यांना मराठीत नवीन फलक लावण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दोन महिन्यांची मुदत दिली आहे, दरम्यान या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मराठी पाट्या हा मुद्द्यावर मनसेने जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णायाने मान्यता मिळाल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत. याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे नेमके काय म्हणाले?

"सस्नेह जय महाराष्ट्र

पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. 'मराठी पाट्या' ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली.

मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं ह्यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे."

"असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे.

दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका.

'मराठी पाट्या' ह्याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजेत." असे राज ठाकरे म्हणाले आहेत.