अरे व्वा... संरक्षित क्षेत्राबाहेर महाराष्ट्राची डरकाळी, जाणून घ्या सविस्तर 

More Tigers in Outside The Protected Area in Maharashtra
More Tigers in Outside The Protected Area in Maharashtra

नागपूर ः संरक्षित आणि संरक्षित क्षेत्राबाहेर शिकार आणि अधिवासावरील अतिक्रमणामुळे वाघांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. असे असताना महाराष्ट्रातील संरक्षित क्षेत्राबाहेर मध्यप्रदेशापेक्षा अधिक वाघ असल्याची बातमी पुढे आली आहे. यामुळे वन्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संरक्षित क्षेत्राबाहेरील वाघ सुरक्षित राहावे आणि मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष कमी व्हावा यासाठी कसोशीचे प्रयत्न वन विभाग करीत आहे. 

मध्य भारत व्याघ्रभूमी म्हणून नावारूपास आली असून, नागपूर हे त्याचे प्रवेशद्वार आहे. या भागात देशातील ४० टक्के वाघ आहेत. २०१४ मध्ये झालेल्या व्याघ्रगणनेत मध्य भारतातील भूभागात ६८८ वाघांची नोंद झाली होती. २०१८ च्या व्याघ्रगणनेत मध्यभारतातील भूभागातील संख्या वाढली असून, ती १०३३ गेली आहे. त्यात मध्यप्रदेशात ५२६ वाघ कॅमेरा ट्रॅपमध्ये आढळले आहेत. ४२२ वाघ प्रत्यक्ष दिसले. यामधील ३१८ वाघांची नोंद मध्यप्रदेशातील बांधवगड, कान्हा, पन्ना, पेंच, डुंबरी, सातपुडा या व्याघ्र प्रकल्पात झाली आहे. 

कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये १ आणि रातापानी अभयारण्यात २७ असे २८ वाघ दिसले. या राज्यातील बालाघाट, बारघाट, भोपाळ, छ्त्तरपूर, देवास, मंडला, उत्तर पन्ना, दक्षिण पन्ना, शहडोला आणि उमरिया या अकरा प्रादेशिक विभागातील संरक्षित क्षेत्राबाहेर फक्त ७८ वाघांची नोंद झालेली आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील चार प्रादेशिक विभागातील संरक्षित क्षेत्राबाहेर १०७ वाघांची नोंद झाली आहे. यावरून मध्यप्रदेशापेक्षा महाराष्ट्रातील संरक्षित क्षेत्राबाहेर अधिक वाघ असल्याचे आकडेवारीवरून पुढे आले आहे. ही बाब वन विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी आहे. 

महाराष्ट्रातील मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, ताडोबा अंधारी, बोर या पाच व्याघ्र प्रकल्पात १८८, पैनगंगा, टिपेश्वर आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला या तीन अभयारण्यात १७ तर संरक्षित क्षेत्राबाहेरील ब्रम्हपुरी, चंद्रपूर, मध्य चांदा, नागपूर, जळगाव, सावंतवाडी आणि इतर क्षेत्रात १०७ वाघ आढळून आले आहेत. ही आकडेवारी मध्यप्रदेशातील संरक्षित क्षेत्राबाहेरील वाघांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. यावरून महाराष्ट्रातील संरक्षित क्षेत्राबाहेरील वन्यजीव व्यवस्थापन चांगले असल्याचे अधोरेखित झाले आहे. 


 महाराष्ट्रात व्याघ्र संवर्धनाकडे विशेष लक्ष 
प्रादेशिक वनातील वन्यजीव व्यवस्थापन उत्तम आहे. त्यामुळेच वाघांची संख्या संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वाढत असून, प्रजननही होते आहे. यावरून महाराष्ट्रात वन आणि वन्यजीव संवर्धनाकडे विशेष लक्ष दिले जात आल्याचे द्योतक आहे. 
गिरीश वशिष्ठ, सेवानिवृत्त वनाधिकारी. 
 
अधिवासासाठी पोषक वातावरण 
राज्य शासन वन व वन्यजीव संवर्धनाकडे विशेष लक्ष देत आहे. त्यामुळे संरक्षित क्षेत्राबाहेरही वन्यप्राण्यांच्या अधिवासासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जंगलाची सलगताही टिकून असल्याने तृणभक्षक प्राणी मोठ्या प्रमाणात सुरक्षित असल्यानेच वाघांची संख्या संरक्षित क्षेत्राबाहेर वाढलेली आहे. 
नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com