मुंबई : राज्यात शिवसेना-भाजप यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून सध्या वाद सुरू आहे. सत्तास्थापनेचा गुंता दिवसेंदिवस आणखीनच वाढत आहे. त्यात शिवसेना भाजपला आणि देवेंद्र फडवणीस यांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत सध्या खूपच आक्रमक झाले आहेत. पत्रकार परिषदांमधून ते आपली भूमिका मांडतच आहेत. पण, सोशल मीडियावरूनही त्यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.
संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन, शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम असून, भाजपने अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदा व्यतिरिक्त चर्चाच करू नये, असे स्पष्ट केले. ज्याच्या कडे बहुमत असेल तोच मुख्यमंत्री होईल, असेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी एक सूचक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेच्या काही ओळी शेअर केल्या आहेत. आग्नेय परीक्षा की, इस घड़ी में आइए, अर्जुन की तरह
उद्घोष करें : ‘‘न दैन्यं न पलायनम्।’’ ही कविता शेअर करताना त्यांनी गितेतील एक संदेशही शेअर केलाय. गीता का संदेश- न दैन्यं न पलायनम् अर्थात कोई दीनता नहीं चाहिए , चुनौतियों से भागना नहीं , बल्कि जूझना जरूरी है! असे राऊत यांनी ट्विट केले आहे.
शिवसेना भूमिकेवर ठाम
शिवसेनेने विधानसभा निवडणूक निकालानंतर 50-50च्या फॉर्म्युल्यावर ठाम आहे. याची चर्चा लोकसभा निवडणुकीत युती करताना अमित शहा यांच्याशीच झाली होती, असं संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. ते म्हणाले, 'यंदा लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमित शहा यांच्यासोबत याची चर्चा झाली होती. तसच सगळं व्हायला हवं. अमित शहा यांना याबाबत सगळं माहिती आहे. त्यामुळच ते या विषयात लक्ष घालत नसल्याचं दिसत आहे.' महाराष्ट्राने महायुतीला जनादेश दिला आहे. त्यांना महाजनादेश दिलेला नाही. त्यामुळं ठरल्याप्रमाणंच सगळं व्हायला हवं. आता जर, सरकार स्थापन होत नसेल तर, हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे, असंही राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.