"एमपीएससी'च्या वन, कृषी, अभियांत्रिकीची होणार एकत्रित परीक्षा ! जाणून घ्या प्रश्‍नपत्रिकेचे स्वरूप अन्‌ गुणांकनाची पध्दत

mpsc exam .jpg
mpsc exam .jpg

सोलापूर : दरवर्षी महाराष्ट्र कृषी सेवा, वन आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षा स्वतंत्रपणे घेतल्या जात होत्या. मात्र, आता या तिन्ही परीक्षा एकत्रित होणार असून त्याची तयारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. 2021 पासून पुढे येणाऱ्या प्रत्येक जाहिरातीनुसार रिक्‍तपदांची भरती करताना त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

सरळसेवेची मुख्य परीक्षा होणार ऑनलाइन
केरळ, गुजरातसह अन्य राज्यातील लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगदेखील सरळसेवेच्या माध्यमातून कमी पदांची भरती होणाऱ्या मोजक्‍या विभागातील रिक्‍त पदांची लेखी परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. त्यादृष्टीने आयोगाने तयारी सुरु केली असून आगामी काळात त्याचा प्रयोग केला जाणार आहे. प्राध्यापक अथवा अन्य कमी पदांच्या भरतीच्या परीक्षेतून आयोग हा प्रयोग करणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अन्य मुख्य परीक्षेतही त्याचा प्रयोग केला जाणार आहे. तत्पूर्वी, लहान परीक्षेतील त्रुटी दूर करून परीक्षा पारदर्शक केली जाईल, असेही आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या कृषी, वन व अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी सुमारे एक ते दीड लाख विद्यार्थी अर्ज करतात. उमेदवारांची संख्या कमी असतानाही तिन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेतल्याने त्यांचा वेळ वाया जातो. राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेअंतर्गत 27 प्रकारची पदे भरली जातात. या पार्श्‍वभूमीवर कृषी, वन आणि अभियांत्रिकीच्या परीक्षा एकत्रित घेतल्या जाणार आहेत. शंभर प्रश्‍नांसाठी 200 गुणांची ही पूर्व परीक्षा असणार आहे. या तिन्ही विभागांच्या मुख्य परीक्षा मात्र, स्वतंत्रपणे होतील. आयोगाने त्यासंदर्भात कृती आराखडा तयार केला आहे. दोन गुणांच्या प्रश्‍नाचे उत्तर चुकीचे लिहिल्यास 0.5 टक्के तर एक गुणाचे उत्तर चुकल्यास 0.25 टक्‍के गुण कपात केले जाणार असल्याची माहिती आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

राज्यसेवेच्या परीक्षेला 25 टक्‍के अनुपस्थिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्य सेवेची पूर्व परीक्षा 21 मार्च रोजी पार पडली. राज्यातील सुमारे आठशे परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी दोन लाख 63 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढलेला जोर आणि पालक-विद्यार्थ्यांच्या मनातील भिती, खासगी-सार्वजनिक वाहतुकीवरील निर्बंध, पूर्व परीक्षेसाठी अवघ्या दोनशेच जागा आणि मुख्य परीक्षेपर्यंत उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधिक्षकांची पदे नव्याने वाढणार नाहीत, या विविध कारणांमुळे यंदा एकूण विद्यार्थ्यांपैकी तब्बल 23 टक्‍के विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदविले आहे. त्यामध्ये एक पेपर झाल्यानंतर दुसऱ्या पेपरला न आलेल्यांचाही समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com