मुंबई - दुष्काळग्रस्त 15 जिल्ह्यांतील युवकांना रोजगाराची संधी प्राप्त व्हावी म्हणून एसटीमध्ये चालक आणि वाहक या पदासाठी चार हजार 242 जागा कायमस्वरूपी भरण्यात येणार असून, या नव्या जागा मराठा आरक्षणासह भरण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
या 15 जिल्ह्यांपैकी औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे या 11 जिल्ह्यांमधील बॅंकलॉग भरून काढण्यात येणार आहे, तर उर्वरित चार जिल्ह्यांसह राज्यातील इतर जिल्ह्यांमधील युवकांना राज्यभरातील भरतीत समाविष्ट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
औरंगाबादेत मेगा सिटी अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बससेवेसाठी एकूण 560 जागा कंत्राटी पद्धतीवर भरण्यात येणार आहेत. यासाठी दरमहा 15 हजार रुपये मानधन व 500 रुपये वाढ देण्यात येणार आहे. या पद्धतीने पाच वर्षांसाठी ही भरती करण्यात येणार असून, त्यानंतर एसटी महामंडळात समाविष्ट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या एसटी महामंडळाचा तोटा 2800 कोटी रुपयांचा आहे. तो कमी करण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. त्यासाठी आढावा बैठक घेण्यात येत असून शिवशाही बसचे अपघात कमी झाले आहेत. यापुढील शिवशाही बसवर एसटी महामंडळाचाच चालक-वाहक राहणार असून त्यासाठी प्रशिक्षण देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
|